गटारींपेक्षा आरोग्य केंद्रे उभारावीत असा सल्ला, मात्र काही क्षणातच कळाली गटारींची आवश्यकता
प्रतिनिधी/मिरज
रस्ते आणि गटारी बांधण्यात नगरसेवकांनी अडकून न राहता आरोग्य केंद्रे उभारावीत, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी मिरजेतील नगरसेवकांना दिला खरा. मात्र, काही क्षणातच निकृष्ठ दर्जाच्या गटारीतून शहरभर वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी आणि त्या पाण्यातच ट्रीमिक्स रस्ता कामाचे उद्घाटन करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला आणि त्यांना मिरजेत चांगल्या गटारींची किती आवश्यकता आहे, याचे महत्त्व कळाले. चंद्रकांत पाटील यांनी स्टेशन चौकात पसरलेल्या गटारीच्या पाण्यावरुनच नगरसेवकांना धारेवर धरले.
गुरूवारी शहरात नव्याने उभारलेल्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ट्रीमिक्स रस्ता कामाच्या उद्घाटनानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मिरजेत आले होते. प्रारंभी त्यांनी मालगांव रोडवरील आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. त्यावेळी भाषण करताना त्यांनी नगरसेवकांनी आता रस्ते आणि गटारीच्या किरकोळ कामांत गुरफाटून राहण्यापेक्षा आरोग्य केंद्रे उभारण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केले होते. मात्र, गेली आठवडाभर निकृष्ठ दर्जाच्या गटारींमुळे दुर्गंधीयुक्त वातावरणात नरकयातना भोगणाऱ्या मिरजकरांना मात्र चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे पचनी पडले नाही. त्यामुळे गेली कित्येक दिवस दुर्गंधीयुक्त पाण्यातच संसार करणारे नागरिक आश्चर्यचकित झाले होते.
मात्र, चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष स्टेशन चौकातील ड्रेनेजची अवस्था पाहिल्यानंतर मिरज शहरात चांगल्या गटारी उभारण्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना सांडपाण्याने भरलेल्या रस्त्यातून प्रवास करीत आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात रस्ता कामाचे उद्घाटन करावे लागले. यावेळी तेथील दुकानदार आणि स्टॉलधारकांचा निकृष्ठ दर्जाच्या गटारीवरुन रोषही त्यांना पत्कारावा लागला. येथील नागरिकांनी या गटारीतून वाहणाऱ्या सांडपाण्याबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी निवेदन स्विकारले नाही. त्यानंतर मात्र, त्यांनी नगरसेवकांना चांगल्या गटारी उभारुन रस्त्यावरुन वाहणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करीत त्यांची कानउघडणी केली.