निर्धारित 20 षटकांची लढत रोमांचकरित्या टाय झाल्यानंतर सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने सुपरओव्हरमध्ये बहरातील इशान किशनला फलंदाजीला उतरवले नाही, या निर्णयाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण, या संघाचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. अनुभवी खेळाडूंवर आपल्याला विश्वास असल्याचे जयवर्धनेने नमूद केले.
यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने 58 चेंडूतच 99 धावांची आतषबाजी केल्यानंतर मुंबई इंडियन्सला निर्धारित षटकात सामना टाय करता आला. केरॉन पोलार्डने देखील 60 धावांचे योगदान देत यात मोलाचा वाटा उचलला. अर्थात, सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचला, त्यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंडय़ा व केरॉन पोलार्ड यांना सलामीला पाचारण करत आश्चर्याचा धक्का दिला. अर्थात, एका षटकात केवळ 7 धावाच करता आल्याने मुंबईची ही खेळी निष्फळ ठरली. जयवर्धनेने या निर्णयाचे समर्थन करताना किशन 99 धावांच्या त्या दमदार खेळीनंतर बराच थकला होता, असे सांगितले.
‘इशान किशन अर्थातच त्या दमदार डावानंतर थकला होता आणि त्यावेळी ताजेतवाने असलेल्या व मैदानात उतरुन उत्तूंग फटके मारण्याची क्षमता असणाऱया फलंदाजांना पाचारण करण्यावर आमचा भर होता. सामना झाल्यानंतर त्याच्या निकालाचे विश्लेषण सोपे असते. पण, पोलार्ड व हार्दिक पंडय़ा यांनी यापूर्वी खेळलेल्या काही सुपरओव्हरमध्ये असे आव्हान पेललेले आहे. सुपरओव्हरमध्ये आमच्या संघाने 10-12 धावा फलकावर लावले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसून आले असते’, असे जयवर्धने म्हणाला. सुपरओव्हरमध्ये बुमराहसारखा भेदक गोलंदाज असला तरी 7 धावांचे संरक्षण करणे कठीण होते, हे देखील लंकेच्या या माजी फलंदाजाने कबूल केले.
‘सुपरओव्हरमध्ये आम्ही 3 चेंडू निर्धाव खेळून काढले. त्यात एक फलंदाज बाद झाल्यानंतर दडपण येणे साहजिक होते. प्रारंभीच एक-दोन चेंडू सीमारेषेपार पिटाळून लावता आले असते तर प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणता आले असते. पण, तसे होऊ शकले नाही. त्याचा आम्हाला फटका बसला. एबी डीव्हिलियर्स व बुमराह आमनेसामने भिडले, ती जुगलबंदी रंगतदार होणे साहजिक असते. पण, संरक्षण करता येईल, अशी धावसंख्या आमच्याकडे नव्हती. तरीही विजयाच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचण्यात आम्ही यशस्वी ठरलो’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.