स्मार्ट सिटी कामासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील कामगाराची व्यथा
अनंत कंग्राळकर / बेळगाव
लॉकडाऊनमुळे स्मार्ट सिटीची कामे बंद ठेवली आहेत. घरच्या सदस्यांना पैसे पाठविता येत नाहीत. परप्रांतात असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीलाही पोहचू शकत नाही, अशी परिस्थिती स्मार्ट सिटी कामासाठी बेळगावात आलेल्या परप्रांतीय कामगारांची झाली आहे. बऱयाच दिवसांपासून आजारी असलेल्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि त्या पाठोपाठ दुसऱयाच दिवशी आजारामुळे भावाचेही प्राण गेले. त्यांच्या अंत्यविधीला पोहोचता आले नसल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही कामे करण्यात येत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. अशातच आता कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने स्मार्ट सिटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यामुळे कामासाठी बेळगावात दाखल झालेले शेकडो परप्रांतीय कामगार बेळगावात अडकले आहेत. विविध कामे घेतलेल्या दावणगेरी येथील कंत्राटदाराकडे 94 परप्रांतीय कामगार आहेत. आतापर्यंत कंत्राटदाराने रेशनकरिता पैसे दिले आहेत. त्यामुळे त्यांना जेवणाची कोणतीच अडचण भासली नाही. मात्र गावाकडे असलेल्या कुटुंबातील सदस्यांची चिंता त्यांना भेडसावत आहे. कुटुंबातील सदस्य आजारी असल्यास किंवा कोणाचा मृत्यू झाल्यास घरी जाता येत नसल्याने मोठय़ा अडचणीत सापडले आहेत. भाऊ आजारी आणि वडील वृद्ध असल्याने घर चालविणे कठीण आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमधील एक तरुण बेळगावात स्मार्ट सिटीच्या कामगारांसमवेत आला आहे. पण बेळगावात काम करून मिळतील तितके पैसे भावाच्या उपचाराकरिता आणि घर चालविण्याकरिता पाठवीत होता. पण लॉकडाऊनमुळे गेल्या वीस दिवसांपासून काम बंद आहे. घराकडे पैसे पाठविण्याबरोबर घर गाठणेही कठीण बनले आहे. अशा स्थितीत रविवारी वडिलांचा मृत्यू झाला. या पाठोपाठ आजारी असलेल्या भावालाही मृत्युने गाठले. अशा परिस्थितीत घरी जाण्यासाठी प्रयत्न केला. पण लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे. एकीकडे घरातील सदस्यांचा मृत्यू आणि दुसरीकडे कोरोनाच्या संकटामुळे कामासाठी आलेल्या विजयकुमार रावत नामक परप्रांतीय कामगारावर अडचणींचा डोंगर कोसळला आहे. वडील व भावाचे अंतिम दर्शन घेण्याचे भाग्यदेखील त्याला लाभले नाही. त्यामुळे 19 वर्षाच्या तरुणाला मानसिक धक्का बसला आहे. अशा स्थितीत त्याला कामावरील अन्य कामगारांनी आधार देऊन धीर दिला आहे. पण तो म्हणतो, घरी माझी एक लहान बहीण आणि वहिणी आहे. त्यांच्यासाठी मला घरी गेलं पाहिजे. काही तरी व्यवस्था करा, अशी विनवणी तो प्रत्येकाकडे करीत आहे.
कृपाकरून मला जाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या
, विजयकुमार रावत
नोव्हेंबर महिन्यात रोजगाराकरिता बेळगावात आलो होतो. भाऊ आजारी होता… वडील वयोवृद्ध असल्याने घरात कमाविणारे कोणी नाही. त्यामुळे मध्यप्रदेशमधून बेळगावला आलो. या ठिकाणी काम करून मिळणाऱया पैशात इथला खर्च भागवून उरलेले पैसे भावाच्या औषधोपचारासाठी वडिलांकडे पाठवत होतो. पण महिना झाला काम बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशातच वडिलांची तब्येत खालावल्याने त्यांचा रविवारी मृत्यू झाला. भाऊ आधीपासूनच आजारी असल्यामुळे वडिलांपाठोपाठ भावाचादेखील सोमवारी मृत्यू झाला. सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने मला वडील आणि भावाचे अंतिम दर्शन व अंत्यविधीसाठी जाता आले नाही. त्यामुळे मला माझ्या गावी जाण्यासाठी मदत करा. माझ्या घरी माझी लहान बहीण आणि वहिणी आहे. ते दोघेच गावाकडे असल्याने मला पोहोचणे गरजेच आहे. कृपाकरून मला जाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती विजयकुमार रावत या परप्रांतीय कामगाराने केली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचा विकास, व्यापारी संकुलांची उभारणी, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम, स्मार्ट बसथांबे, शहर आणि मध्यवर्ती बसस्थानकांची उभारणी करण्यात येत आहे. आधीच धिम्यागतीने सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे कोरोनामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. स्मार्टसिटीची कामे करण्याचे कंत्राट विविध शहरांमधील कंत्राटदारांनी घेतली असल्याने कोलकाता, ओडिशा, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा विविध परराज्यांतील कामगार आणण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामासाठी दोनशेहून अधिक परप्रांतीय कामगार बेळगावात आहेत. पण सध्या काम बंद असल्याने या कामगारांची अवस्था खुपच खराब झाली आहे. काम बंद ठेवून 20 दिवस झाले असून काम केलेला पगार घेऊन आतापर्यंत खाण्यापिण्याची सोय झाली. मात्र आता पैशाची चणचण भासू लागली आहे. काही कंत्राटदारांनी कामगारांना वाऱयावर सोडले असल्याने कामगार अडचणीत आले आहेत. व्हॅक्सिन डेपो परिसरात 45 कामगारांनी आसरा घेतला आहे. त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. पाणी आणण्यासाठी बाहेर पडताच पोलिसांची लाठी बसत आहे. त्यामुळे परिसरात भटकंती करून पाणी आणावे लागत आहे.
स्मार्टसिटी योजनेंतर्गत स्मार्ट शहर बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या अंतर्गत शहर आणि मध्यवर्ती बसस्थानकाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग निर्माण करण्यात येत आहे. याकरिता खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र शहर बसस्थानकासह भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. हे काम करण्यासाठी कोलकाता येथील 45 कामगार आले होते. मात्र सदर काम लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आल्याने सर्व कामगार अडकून पडले आहेत. आपल्याकडे असलेल्या पैशामधून अन्नधान्य विकत आणून मागील वीस दिवसांपासून त्यांनी आपले पोट भरले. मिळालेल्या पगाराची रक्कम गावाकडे असलेल्या कुटुंबीयांना पाठविली. यापुढे कसे पोट भरायचे, असा मुद्दा ऐरणीवर आला होता. महापालिकेकडून शनिवारपासून नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. मात्र, बेळगावात अडकलेल्या कामगारांना गावाकडे असलेल्या कुटुंबाची चिंता लागली आहे.
कंत्राटदाराने कोणतीच दक्षता घेतली नाही
13 डीआय-5, दीपक बिस्वास
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मध्यवर्ती बसथांब्याचे काम करण्यासाठी कोलकाता परिसरातून आम्ही 45 कामगार आलो होतो. पण लॉकडाऊनमुळे सध्या काम बंद ठेवण्यात आले आहे. यापूर्वी काम केलेला पगार कंत्राटदाराने दिला होता. त्यापैकी काही रक्कम गावाकडे पाठविली होती. थोडी रक्कम आमच्या जवळ ठेवली होती. त्यामधून लागणारे साहित्य घेऊन जेवणाची व्यवस्था केली आहे. काम बंद ठेवून 20 दिवस झाले, पण कंत्राटदाराने जेवण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीच दक्षता घेतली नाही. काही नागरिकांना आणि अधिकाऱयांना माहिती दिल्यानंतर महापालिकेला कळवून जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सध्या जेवणाची काळजी मिटली आहे. मात्र आमचे कुटूंब गावाकडे असल्याने त्यांना आमची आणि आम्हाला कुटुंबातील सदस्यांची चिंता लागली असल्याचे दीपक बिस्वास यांनी सांगितले.