प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी, देशमुख रोड व शुक्रवारपेठ कॉर्नरवर निर्माण झालेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करूनही खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात आली नसल्याने खड्डय़ांना तळय़ाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ परिसरातील व्यापारी व रहिवाशांनी खड्डय़ांमध्ये झाड लावून वनमहोत्सव साजरा केला. खड्डे बुजवून रस्ता स्मार्ट करण्याची मागणी करण्यात आली.
टिळकवाडी पहिल्या गेटपासून देशमुख रोड व शुक्रवार पेठच्या कॉर्नरवर मोठे असंख्य खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातून ये-जा करणाऱया पादचाऱयांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये पाणी साचून राहत असल्याने तळय़ाचे स्वरुप आले आहे. देशमुख रस्त्याची तर अक्षरश: चाळणच झाली असून, वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डय़ांमुळे दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. परिणामी हा परिसर अपघातप्रवण बनला असल्याने या परिसरात दररोज अपघात घडत आहेत. अशा स्थितीतही काही तरुण धूम स्टाईलने वाहने चालवित असल्याचे प्रकार पाहावयास मिळत आहेत. ठळकवाडी हायस्कूलच्या मागील बाजूस स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. सदर गतिरोधक वाहनधारकांना दिसत नसल्याने वाहनांचे अपघात घडत आहेत. या गतिरोधकांवर पांढऱया रंगाचे पट्टे मारण्यात यावेत. तसेच गतिरोधक असल्याबाबतचे माहिती फलक लावण्याची मागणी होत आहे. निर्माण झालेले खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील व्यापारी, रहिवासी आणि वाहनधारक करीत आहेत. प्रथम रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व मगच स्मार्ट रस्ते बनवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरात निर्माण झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे खड्डय़ांमध्ये रोपटी लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी परिसरातील व्यापारी व रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.