आमदार रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती : सरकार विरोधात विरोधकांना एकत्रित आणणार
प्रतिनिधी /पणजी
आगामी 2022 च्या निवडणुकीत आपण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अपक्ष राहायचे की कुठल्या पक्षात जायचे याबाबत चर्चा सुरु आहे. आपण कुठे जाणार तेथे सर्वांना एकत्रित आपला प्रयत्न असेल. मुख्यमंत्र्यांना घरी पाठविल्याशिवाय गप्प बसणार नाही. योग्य वेळी आपण योग्य निर्णय घेणार असल्याचे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सांगितले.
पर्वरी येथे आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे खंवटे म्हणाले, राज्यात सरकार विरोधात चीड वाढलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. जनता मुख्यमंत्री व भाजपाला घरी पाठविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित राहाणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राज्यात तृणमृल काँग्रेस आलेला आहे. केंद्रात ममतादिदी विरोधक म्हणून उभ्या राहाणार आहेत मात्र केंद्र व राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील जनता खूप हुशार असून त्यांना कोणाला मत द्यायचे हे माहीत आहे. पुढील महिन्याभरात सर्व राजकारण खुले होणार आहे. कोण आघाडी करतात, मते फोडण्यासाठी कोण रिंगणात उतरणार हे सर्व स्पष्ट होणार आहे, असे रोहन खंवटे म्हणाले.
पितृपक्षानंतर हालचालींना वेग
येत्या निवडणुकीत आपण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कुठल्या पक्षात जायचे वा कोणती भूमिका घ्यावी याबाबत चर्चा सुरु आहे. जेथे जाणार तेथे सर्वांना एकत्रित आणण्याचा आपले प्रयत्न असणार आहे व सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे. सध्या पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्ष संपल्यानंतर या हालचालींना वेगळ येणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.