300 कर्मचाऱयांसह आपत्कालीन यंत्रणा तैनात
प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटीनजीक खताची वाहतूक करणाऱया मालगाडीचे 9 डबे घसरून झालेल्या अपघाताने रेल्वे प्रशासन हादरले आहे. रविवारी रातोरात 500 कामगारांच्या सहाय्याने खताची पोती बाहेर काढून अपघातग्रस्त डबे रिकामे करण्यात आले. सोमवारी दिवसभर घसरलेले डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. यासाठी रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणांसह 300 रेल्वे कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसभरात 6 डबे हटवण्यात यश आले असून ट्रक दुरूस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
तुर्भे-मुंबईतून कर्नाटकला खत घेवून जाणाऱया मालगाडीचे 9 डबे रविवारी सायंकाळी दिवाणखवटी नजीक घसरले होते. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाची धावाधावच सुरू झाली. तातडीने एआरएमव्ही व एआरटी व्हॅन घटनास्थळी तैनात करण्यात आली. अपघातग्रस्त डब्यातील खताची पोती सर्वप्रथम बाहेर काढून डबे रिकामे करण्यात आली. 500हून अधिक खासगी कामगारांकरवी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोती बाहेर काढण्याचे काम सुरू होते. रेल्वेचे कर्मचारीही रात्रभर अपघातस्थळीच तळ ठोकून होते.
रूळावरून घसरलेले डबे हटवण्यासाठी वेरणा येथून 140 टनी क्रेन आणण्यात आली आहे. रेल्वेचे 300 हून अधिक रेल्वे कर्मचारीही तैनात करण्यात आले. याद्वारे सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत डबे रूळावरून बाजुला करण्याचे काम सुरू होते. दुपारी 3 वाजेपर्यंत घसरलेल्या 9 डब्यांपैकी 6 डबे हटवण्यात यश आले. उर्वरित 3 डबे बाजुला करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
अपघातात रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या ट्रकच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मालवाहतुकीची सेवा ठप्पच असून रेल्वे ट्रकच्या दुरूस्तीनंतरच ही सेवा पूर्ववत होणार आहे. मात्र हा मार्ग नेमका कधी सुरू होईल हे मात्र रेल्वे प्रशासनाने अजून स्पष्ट केले नाही. अपघाताचे नेमके कारणदेखील अजूनही अस्पष्टच असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.