कोलाड, दिवाणखवटी, खेडमधील कर्मचाऱयांचा समावेश
प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावरील सुकिवलीनजीक घडलेल्या मालवाहू ट्रक अपघातप्रकरणी 16 रेल्वे कर्मचाऱयांची चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे चार सदस्यीय समितीमार्फत ही चौकशी होणार असून यामध्ये कोलाड, दिवाणखवटी व खेडमधील कर्मचाऱयांचा समावेश आहे.
सुकिवलीनजीक धावत्या ‘रोरो’तून मालवाहू ट्रक रूळावरून कोसळून अपघात घडला होता. अपघातात ट्रकचालक वसीम शेख बालंबाल बचावला तर ट्रकचा पूर्णपणे चुराडा झाला होता. गेल्या 20 वर्षात प्रथमच घडलेल्या या अपघाताने रेल्वे प्रशासनही पुरते हादरले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त मालवाहू ट्रक बाजूला करत विस्कळीत वाहतूक तातडीने पूर्ववत केली. या अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनाने विविध खात्यांतर्गत तातडीने चार सदस्यीय समिती नेमली आहे. त्यानुसार कोलाड, दिवाणखवटी, खेड या रेल्वे स्थानकातील 16 कर्मचाऱयांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीनंतरच अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे.