राज्यात अपघातांची मालिका सुरूच, 202 जणांनी जीव गमावला
प्रतिनिधी /पणजी
राज्यात दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरूच असून, वाढत्या अपघातामुळे राज्याची चिंता वाढली आहे. वर्ष संपण्यास अजून 36 दिवस राहिले असतानाच गतवर्षीपेक्षा यंदा ऑक्टोंबरअखेर 2495 अपघातांची नोंद झाली असून, यात 202 नागरिकांना विविध अपघातांत जीव गमवावा लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात 251 अपघात घडले असून, यात महिनाभरात 23 लोकांचे अपघाती निधन झाले आहे.
राज्यातील वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक सुरक्षा सप्ताह काळात जनजागृती करण्यात येऊनही वाहनांचा अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे व नियम मोडणे आदी कारणांमुळे अपघात वाढत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे राज्यातील प्रत्येक तालुक्यात विकासाच्या नावाखाली खोदलेले खड्डे, खराब झालेले रस्ते यामुळेही अपघात घडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
गेल्या दोन दिवसांत फोंडा तालुक्यात पाठोपाठ गंभीर अपघाताचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आज चिखली येथे कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन महिलेला जीव गमवावा लागला आहे.
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस व वाहतूक पोलीस यांचे सांघिक प्रयत्न सुरू आहेत. तरीही हे अपघात घडण्यामागे बहुतेक नागरिक चुकीच्या पद्धतीने वाहने चालवणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, विना हेल्मेट प्रवास करणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे आदी कारणांमुळे अपघात वाढत आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळल्यास निश्चितच अपघाताची संख्या कमी होईल.
– ब्रॅण्डन डिसोझा, वाहतूक पोलीस निरीक्षक.
2022 सालातील जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी
- एकूण अपघात – 2495
- जीवघेणा अपघात (ठार) – 202
- गंभीर स्वरुपाचे अपघात – 164
- किरकोळ दुखापत अपघात – 441
- विना इजा झालेले अपघात – 1688
- एकूण व्यक्तींना अपघात – 217
- गंभीर दुखापत – 211
- किरकोळ दुखापतग्रस्त – 634
- एकूण अपघातग्रस्त रायडर – 148
- अपघातग्रस्त चालक – 9
- अपघातग्रस्त पादचारी – 41
- अपघातग्रस्त प्रवासी – 13
- अपघातग्रस्त सायकलस्वार – 1
- इतर अपघातग्रस्त – 5