वार्ताहर/ मायणी
विखळे ता- खटाव येथील मल्हारपेठ -पंढरपूर या राज्यमार्गावर देशमुख वस्तीनजीक दुचाकी व कारचे धडकेत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची खळबळ जनक घटना घडली असून मृतात मायणी येथील दुचाकीस्वार युवक व कार मधील लातूर जिह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गावरील विखळे गावच्या देशमुख वस्ती नजीक विखळे कडून मायणी कडे सुरज राजाराम माळी हा युवक दुचाकी घेऊन चालला असता कोल्हापूर येथे देवदर्शन घेऊन सय्यदपूर ता.देवनी,जि. लातूर कडे भरधाव जाणाया इर्टीगा कारने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या दुचाकीस्वाराला भीषण धडक देत रस्त्याच्या बाजूच्या संरक्षण काठडय़ास धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक सुरज राजाराम माळी वय 27 रा.मायणी,ता-खटाव,जि सातारा,व कार मधील संतोष किसनराव बिरादार वय.40रा.सय्यदपूर जि-लातूर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चारचाकी वाहनातील चालक महेश विठ्ठलराव जळकुटे,जोतिराम धनाजी बिरादार,सौदागर राजकुमार बिरादार,दत्तात्रय भीमराव बिरादार रा.सय्यदपूर ता.देवनी,जि-लातूर या चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना सातारा येथे इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर संदीप शामराव बिरादार रा.सय्यदपूर हे किरकोळ जखमी झाले आहेत. मायणी येथील मयत युवक सुरज राजाराम माळी याच्या अकाली निधनाने मायणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर अपघाताची नोंद मायणी पोलीस दुरक्षेत्र येथे रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते .याबाबत पीएसआय शहाजी गोसावी करीत आहेत.