प्रतिनिधी /बेळगाव
पोस्ट कार्यालयासमोरील पोस्टमन चौकातील पुतळय़ाच्या कठडय़ाला वाहन ठोकरल्याने संरक्षक कठडय़ाचे नुकसान झाले आहे. चौकात खड्डय़ांचे साम्राज्य असताना पुतळय़ाच्या कठडय़ाची हानी झाली नाही. मात्र रस्त्याची डागडुजी झाल्यानंतर पोस्टमन पुतळय़ाच्या कठडय़ाला वाहन ठोकरले आहे. त्यामुळे अजब अपघाताबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोस्टमन चौकात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चौकातील खड्डय़ांची डागडुजी करण्यात आली. परिसरातील खड्डे बुजविण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले होते. पावसाळय़ात पाणी साचून रहात असल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले होते. तसेच चौकात रहदारी जास्त असल्याने चौकातील खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी सातत्याने होत होती. खड्डय़ांमुळे चौकात लहान-मोठे अपघात घडत होते. पण चौकातील पोस्टमन पुतळय़ाच्या संरक्षक कठडय़ाची हानी झाली नाही. मात्र चौकातील खड्डे बुजविल्यानंतर झालेल्या अपघातामुळे पोस्टमन पुतळय़ाच्या संरक्षक कठडय़ाचे नुकसान झाले आहे.