वार्ताहर /उसगांव
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाची लाज राखण्यासाठी रस्ता विभागाच्या मालमत्तेचा वापर असाही होऊ शकतो, हे तिस्क उसगाव येथील काही समाज कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. पाणी विभागाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ामुळे वाहनांना निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी चक्क दिशा दर्शक फलकाचा अडथळाच उभा करण्यात आला आहे.
तिस्क उसगांव येथील एमआरएफ कंपनीच्या नवीन बॅडबरी युनिटजवळ काही महिन्यापूर्वी एका घराला नळजोडणी देण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. जलवाहिनी टाकल्यानंतर माती टाकून हा चर बुजविण्यात आला. मात्र गरजेपेक्षा जास्त रस्ता खोदला गेल्याने काही दिवसातच संपूर्ण माती उखडून तेथे भला मोठा खड्डा तयार झाला. त्यासंबंधी प्रसार माध्यमावर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काँक्रिट घालून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला. पण आता परत एकदा रस्त्यावरील एका बाजूचे काँक्रिट उखडून पुन्हा मोठा खड्डा तयार झाला आहे. दोन्ही बाजूची वाहने हा खड्डा चुकविण्यासाठी एकाच बाजूने येत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्यावेळी या खड्डय़ाच्या अंदाज न आल्याने अपघात होऊन काही दुचाकीचालक जखमीही झाले आहेत. पाणी विभागाचे कर्मचारी व अभियंते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रविवारी पहाटे काही जागरुक समाज कार्यकर्त्यांनी बेळगांव बगलमार्गावरील दिशादर्शक फलक उखडून खड्डय़ाजवळ अडथळा निर्माण करण्यात आला.
प्रशासन सध्या लोकांच्या दारी फिरत आहे. उसगाव भागात पोचयला त्याला अजून उशिर आहे. त्यामुळे काही समाज कार्यकर्त्यांनी सरकारची लाज झाकायला सरकारच्याच मालमत्तेचा वापर कल्पकतेने केल्याचे पाहायला मिळते.