वार्ताहर / लोणंद
काळज (ता. फलटण) गावच्या हद्दीत रामनगर परिसरातील ओम त्र्यंबक भगत या 10 महिन्याच्या बालकाचे मंगळवारी 5 वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले होते. त्या चिमुरडय़ाचा मृतदेह त्यांच्या घरामागे सुमारे 100 मीटर अंतरावर असणाऱया विहिरीत सापडल्याने या घटनेने सातारा जिह्यात खळबळ उडाली आहे. फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या अवघ्या दहा महिन्याच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच पोलीस यंत्रणा कसोशीने तपास घेत होती. गुरुवारी सकाळी मृतदेह सापडल्याने त्याचे अपहरण कोणी केले? खून कोणी केला? नेमके काय झाले? असे सवाल उपस्थित होत आहेत. या घटनेचे गुढ वाढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास चिमुरडय़ा ओमचे वडील हे विहीरीवर गेले असता त्यांना त्या बालकाचा मृतदेह विहिरीत असल्याचे दिसले. मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास काळज रामनगर (ता. फलटण) येथून ओम त्र्यंबक भगत (वय 10 महिने) या बालकास एक संशयित पुरुष व एक संशयित महिला या जोडप्याने मोटारसायकलवरून राहत्या घरातुन पळवून नेले होते. ओम भगत या लहान बालकास पळवून घेऊन जाणारा संशयित पुरुष अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाचा असून त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट घातली असून त्याच्यासोबत असणाऱया संशयित महिलेने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता.
आठ पथके घेत होती शोध
या माहितीवरुन पोलीस यंत्रणा मंगळवारपासून कसोशीने शोध घेत होती. 8 पथके जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा शोध घेऊन गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत होती. पण गुरुवारी सकाळी त्या बालकाचा मृतदेह घरामागील विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. नक्की काय काय झाले याचे गुढ वाढले आहे. चिमुरडय़ाचा मृतदेह पाहताच नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला. काळीज पिळवटून टाकणाऱया या घटनेने गावकऱयांचे मन सुन्न झालं होते.
गुरुवारी सकाळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी भेट दिली. त्यानंतर बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा सिव्हील हॉस्पीटल येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर बाळाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे समोर येईल. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.