प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यातील आसले येथील युवकाचे अपहरण करुन सहा जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याचा प्रकार दि. 4 रोजी घडला. त्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली असून त्याप्रकरणी सहा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना जेरबंद केले आहे. तर फरारी असलेल्या दोन जणांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, वाई तालुक्यात खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानभूमीत दहन करण्याची दुसरी घटना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातील आसले येथील युवक ओमकार कैलास चव्हाण (वय 30) हा दि. 4 रोजी घरात पाचवड येथील नेट कॅफेत जावून येतो असे सांगून निघून गेला तो परत आला नसल्याने त्याचे वडिल कैलास लक्ष्मण चव्हाण यांनी अगोदर नातेवाईक, मित्र यांच्याकडे चौकशी केली. तो आढळून न आल्याने बेपत्ता झाल्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात त्यांनी दिली. भुईंज पोलीस ठाण्यात दि. 6 रोजी बेपत्ता झाल्याची खबर दिल्यानंतर भुई&ज पोलिसांचा तपास सुरुच होता. त्याच दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना खास खबऱयांमार्फत माहिती मिळाली की त्या युवकाचा खून करुन पुरावा नष्ट करण्याची घटना घडली आहे. त्यावरुन धुमाळ यांनी याबाबतची कल्पना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. बन्सल यांना या घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच पोलीस निरीक्षक धुमाळ यांना तातडीने गुन्हेगारांचा शोध घ्या, असे आदेश दिले.
बेपत्ता झालेल्या ओमकार चव्हाण यांचा मृतदेह शोधण्यापासून ते मारेकऱयांपर्यंत पोहचणे तसे अवघड होते. परंतु एका छोटय़ाशा मिळालेल्या पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर धुमाळ यांनी संशयितांच्यापर्यंत पोहोचले अन् संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुह्याची कबुली पोलिसांकडे दिली.
त्यामध्ये सहा जण आरोपी असल्याची माहिती समोर आल्यानंतर अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये रोहन राजेंद्र यादव, रोहित संजय घाडगे, समाधान उर्फ चंप्या राजेंद्र शिंदे, सलीम ख्वाज्यासाहेब शेख (सर्व रा. भुइं&ज, ता. वाई) यांचा समावेश असून अन्य दोन जण फरार झाले आहेत. त्यांनी पोलिसांच्याजवळ दिलेल्या कबुलीनुसार ओमकार चव्हाण यास दि. 4 रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर बसवून अपहरण केले. कृष्णा नदीच्या काठावर नेवून त्यास सहा जणांनी उतरुन दांडाक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. झालेल्या गंभीर मारहाणीत ओमकार याचा मृत्यू झाला. या खुनाची कोठेही वाच्यता होवू नये म्हणून त्याचा मृतदेह त्या सहा जणांनी स्मशानभूमीत जाळला. कसलाही पुरावा मागे न राखता हे सहा जण आपआपल्या घराकडे जाण्यापूर्वी ओमकारच्या बोटातील सोन्यांची अंगठी आणि खिशातील मोबाईल घेवून गेले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, उत्तम दबडे, पोलीस हवालदार आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण पडतरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, संकेत निकम, केतन शिंदे, चालक पो. ना. संजय जाधव, पो. कॉ. गणेश कचरे यांनी केली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
मुख्य संशयिताच्याही मुसक्या आवळणार
या मुख्य संशयितासह एक जण फरारी झाला असून त्यांच्या शोधासाठी एक पथक त्यांच्या मागावर पाठवण्यात आले आहे. लवकरच त्या दोघांना ताब्यात घेण्यात येणार आहे. असे गुन्हे होवू नयेत यासाठी पोलीस अधीक्षकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिह्यात कारवाई सुरु आहे. गुह्यांना लगाम लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.