8-10 वर्षे उलटूनही प्रकरणांचा तपास नाही : नवजात शिशूंचे अपहरण करणाऱया टोळीचा छडा लावण्यात अपयश : अपहृत मुलांच्या पालकांच्या नशिबी प्रतीक्षाच
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या महिन्यात हुबळी येथील किम्स सरकारी इस्पितळात उपचारासाठी आलेल्या 40 दिवसांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर लगेच दुसऱयादिवशी ती बालिका किम्सजवळच आढळून आली. केवळ दोन दिवसांत या अपहरण प्रकरणाचा सुखान्त झाला. अशीच आणखी तीन अपहरण प्रकरणे बेळगाव येथून घडली आहेत. या अपहरण प्रकरणांना 8-10 वर्षे उलटूनही त्यांचा छडा लागला नाही.
सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभाग व केएलई इस्पितळातून नवजात शिशूंचे अपहरण झाले होते. हुबळी येथील बालिकेच्या अपहरणानंतर या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न झाले, याचाही तपशील उपलब्ध नाही. एकामागून एक अशी 8 ते 10 वर्षे उलटली तरी अपहृत मुलांच्या पालकांच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे.
10 जून 2022 रोजी कुंदगोळ येथील सलमा शेख या महिलेने आपल्या 40 दिवसांच्या बालिकेला उपचारासाठी हुबळीच्या किम्स इस्पितळात दाखल केले होते. 13 जून रोजी सलमाच्या हातातून त्या बालिकेला हिसकावून अपहरण करण्यात आले होते. केवळ हुबळी-धारवाड या जुळय़ा शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमटले. पोलिसांनी तपास हाती घेतला. दुसऱयाच दिवशी 14 जून रोजी ती बालिका किम्स परिसरातच आढळली. अपहरणकर्त्यांनी तिला सोडून दिले.
या अपहरणनाटय़ामागे नेमकी कोणती कारणे आहेत? त्या बालिकेची आई सलमा शेखचे या प्रकरणातील वागणेही संशयाला जागा करणारे होते. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. 23 जुलै 2014 रोजी बेळगाव येथून एक दिवसाच्या नवजात शिशूचे अपहरण झाले होते. या अपहरण प्रकरणाचा अद्याप छडा लागला नाही.
23 जुलै 2014 रोजी केएलई इस्पितळातून बाळाचे अपहरण
इंद्रप्रस्थनगर, जुनी हुबळी येथील गणेश वासुदेव तापसकर यांची पत्नी ऐश्वर्या (वय 23) ही प्रसूतीसाठी 22 जुलै 2014 रोजी येथील केएलई इस्पितळात दाखल झाली होती. घटप्रभा फ्री वॉर्डमध्ये तिला दाखल करण्यात आले होते. तिने एका मुलाला जन्म दिला. दुसऱयाच दिवशी 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजता वॉर्डमध्ये शिरलेल्या एका महिलेने बाळाला बीसीजी लस द्यायला हवी, असे सांगत बाळाचे अपहरण केले होते. अद्याप लस का दिली नाही, अशी विचारणा करीत अज्ञात महिलेने बाळाला हातात घेऊन खेळविल्यासारखे करून व नंतर लस देण्याचे सांगून नेले होते.
त्याच दिवशी एपीएमसी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला. इस्पितळातील सीसीटीव्ही फुटेजवरून अज्ञात महिलेचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. आठ वर्षांनंतरही तिचा शोध लागला नाही. ते बाळ आपल्या पालकांजवळ असते तर आता आठ वर्षांचे झाले असते.
13 जुलै 2012 रोजी सिव्हिलमधून बाळाचे अपहरण
या घटनेच्या ठीक दोन वर्षे आधी सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून एका नवजात शिशुचे अपहरण झाले आहे. 13 जुलै 2012 रोजी हे अपहरण झाले होते. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. याचाही अद्याप तपास लागलेला नाही. पोलीस दलाला या दोन्ही घटनांचा जणू विसरच पडला आहे.
तीन अर्भकांचे अपहरण
सुधा बसवराज असुंडी (वय 25) मूळची राहणार हगेदाळ, ता. हुक्केरी, सध्या राहणार शिवबसवनगर या महिलेने जन्म दिलेल्या अर्भकाचे अपहरण करण्यात आले. या घटनेआधी एका अनाथ बालकाचेही सिव्हिल हॉस्पिटलमधून अपहरण झाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमधून 2 व खासगी इस्पितळातून 1 अशी एकूण 3 अपहरण प्रकरणे घडली आहेत. या तिन्ही प्रकरणांची एपीएमसी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
हुबळी येथील किम्स इस्पितळात घडलेल्या अपहरण प्रकरणाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. वृत्तवाहिन्यांनीही त्याला भरभरून प्रसिद्धी दिली. बेळगाव येथील तीन घटना घडल्या, त्यावेळी सोशल मीडियाचा आवाका आजच्या इतका नव्हता. खासगी वाहिन्यांची संख्याही कमी होती. म्हणून त्या घटनांची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. पोलिसांनी इस्पितळ कर्मचारी व काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास केला तरी अपहृत बालकांचा शोध लागला नाही.
सामाजिक दबाव कारणीभूत
लग्नानंतर लगेच ‘गोड बातमी’ मिळावी अशी अपेक्षा नवविवाहितांचे कुटुंब आणि नातेवाईकांकडून केली जाते. त्यातच जर एखाद्या वैद्यकीय अडचणीमुळे जर पाळणा लांबला तर त्या विवाहितांना समाजाकडून लक्ष्य केले जाते. एकीकडे अशी स्थिती तर अनैतिक संबंधातून अपत्य प्राप्ती झाल्यानंतर ते उकिरडय़ात फेकून दिले जाते. बालसुधारगृहात किंवा अनाथाश्रमात ही बालके पोहोचतात. तेथून त्यांना दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया ही अत्यंत क्लिष्ट असते. त्यामुळे थेट इस्पितळातून नवजातांचे अपहरण करण्याचे प्रकार घडतात.