प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या वाढणाऱया भरमसाठ संख्येमुळे कोरोना लसीकरण मोहीम गतिमान केली आहे. परंतु लसीच्या अपुऱया डोसमुळे ही मोहीम बॅकफुटवर गेली आहे. शुक्रवारी को-व्हॅक्सीनचे सव्वापाच हजार डोस प्राप्त झाले पण ते अपुरेच आहेत. हे डोस सोमवार 19 एप्रिल रोजी लसीकरणासाठी ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून मंगळवारी लस न मिळाल्यास लसीकरण केंद्र पुन्हा बंद ठेवण्याची वेळ येणार आहे.
जिह्यात कोरोना लसीकरणासाठी 112 केंद्रे सज्ज आहेत. मात्र कोराना लसीच्या अपुऱया पुरवठय़ामुळे अनेक केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिह्यात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 903 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हय़ात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. मात्र लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रविवार 18 एप्रिल रोजी कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी 19 एप्रिल रोजी उपलब्ध डोसनुसार लसीकरण पुन्हा सुरु होणार आहे. कोविड लसीचे 2 डोस घेणे आवश्यक असून लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते व मृत्यूचा धोका टळण्यास मदत होत असल्याने लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.