पावसाच्या अगोदर काम न झाल्यास रस्ता बंद होण्याची शक्यता
प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यापैकी असलेल्या राक्षी ते घंगुरु मार्गावर निकमवाडी गावालगतच्या मोहरीची पावसाळ्या पार्श्वभुमीवर पाईप बदलण्याचे काम सुरु होते. मात्र याकामाबाबत तक्रार झाल्याने सदरचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने काम अर्धवट राहिल्यास या रस्त्याला कधी काय होईल हे सांगणे कठीण बनले आहे.
पन्हाळ्याच्या बांधारी परिसरातील दुवा असणारा राक्षी-घुंगुर रस्त्यावरील निकमवाडी गावाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागातुन येणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला काही धोका होवु नये यासाठी मोहरी बांधण्यात आली आहे. गेल्यावेळच्या झालेल्या अतिव्रुष्टीमुळे मोहरीचे नुकसान होऊन पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलली. या कारणाने मोहरीचे पाईप बदलण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले होते. पण सदरच्या मोहरीचे पाणी हे दक्षिणेस खालच्या बाजूस असणाऱ्या खाजगी रान मालकाच्या रानात जाऊन मोठ्या प्रमाणात भुस्कलन झाले होते. तशी परिस्थिती पुन्हा होवु नये म्हणुन त्या रान मालकांनी मोहरीचे काम थांबवले आहे.
पावसाळा सुरु झाल्याचे निकष दिसुन देखील यावर काही तोडगा निघाला नसल्याने पावसामुळे हा रस्ता पूर्ण खचून जाण्याची दाट शक्यता आहे. अर्धवट राहिलेल्या कामामुळे याठिकाहून चारचाकी वाहन एकेरी मार्गानेच ये-जा करु शकते. त्यातच या रस्त्याच्या कडेला संरक्षक ग्रील नाही व हा निकमवाडी येथील हा रस्ता तीव्र वळणाचा व चढ-उताराचा असल्याने या अपुर्ण कामामुळे मोठी अडचण झाली आहे. याचे काम तातडीने न झाल्याच या पावसात हा रस्ता खचुन बंद झाल्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. रस्त्यावरून रोज अनेक गाड्या ये-जा करत असतात. गुडे, सोमवारपेठ, इंजोळे, खडेखोळ, बांदिवडे, करंजफेण, घुंगरवाडी आदी गावातील वाहतुक या रस्त्यावरुन होते.
या प्रकाराबाबत वाहनधारक व जनतेतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काम पूर्ण करावे अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात ज्या प्रमाणे पन्हाळगडाचा मुख्य रस्ता खचुन वाहतुक पुर्णपणे बंद झाली होती तशीच पुनराव्रत्ती होईल यात शंका नाही.