सांगली / प्रतिनिधी
अपेक्स हॉस्पिटलमधील रुग्ण मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाला यामध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर, रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होईल, असेही रुईकर, चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
रुईकर म्हणाले, अपेक्स हॉस्पिटलमध्ये ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला महापालिका आयुक्त, वैधकीय अधिकारी व जिल्हा प्रशासनाचा बेजबाबदार कारभार जबाबदार आहे. अपेक्सला परवानगी देताना महापालिका प्रशासनाने कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे. हॉस्पिटल मध्ये कोणतीही सक्षम यंत्रणा नसताना कोणतीही शहानिशा न करता कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉस्पिटलबाबत तक्रारी असताना ते तात्काळ बंद करण्यात आले नाही. वास्तविक तेथील गैरकारभार समोर आल्यानंतर हॉस्पिटल बंद करून दाखल रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्याची गरज होती. मात्र रुग्णांना मृत्यूच्या दाढेत नेण्याचे काम प्रशासनाने केले. याला मनपा आयुक्त, वैधकीय अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनही जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी अपेक्षित आहे, असेही रुईकर, चव्हाण यांनी सांगितले.