पाकिस्तानलाही निमंत्रण – पाक एनएसए आल्यास दोन्ही देशांदरम्यान 5 वर्षांमध्ये पहिली उच्चस्तरीय बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील महिन्यात भारत अफगाणिस्तानच्या स्थितीवर एका जागतिक परिषदेचे आयोजन करणार आहे. या परिषदेत सामील होण्यासाठी भारताने अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना निमंत्रण दिले आहे. या देशांमध्ये पाकिस्तान आणि रशिया देखील सामील आहे. या दोन्ही देशांसोबत चीन, इराण, उझ्बेकिस्तानलाही निमंत्रित करण्यात आले आहे.
या बैठकीत अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जानंतर निर्माण झालेले मानवी संकट आणि सुरक्षा संकटावर चर्चा करण्यात येणार आहे. तालिबानला स्वतःच्या राजवटीत मानवाधिकारांचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासंबंधीही चर्चा होणार आहे. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सेक्रेटेरिएटकडून आयोजित केल्या जाणाऱया या बैठकीचे नेतृत्व भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करणार आहेत. ही परिषद इराणमध्ये यापूर्वी आयोजित क्षेत्रीय सुरक्षा परिषदेसारखीच असेल. या परिषदेत तालिबानकडून जगाला असलेल्या अपेक्षांबद्दल त्याला कळविण्यात येणार आहे.
2016 नंतर पहिल्यांदाच…
भारतात सातत्याने वाढणाऱया सीमापार दहशतवादाच्या घटनांमुळे केंद्र सरकार पाकिस्तानला लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांना नियंत्रण मिळवावे लागणार असल्याचे बजावत आहे. अशा स्थितीत भारतात होणाऱया बैठकीत पाकिस्तानची कोणती हिस्सेदारी असणार आणि पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ या परिषदेत समील होण्यासाठी भारतात येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मोईद यात सामील झाल्यास 2016 मध्ये तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विदेश विषयक सल्लागार सरताज अजीज यांच्या भारत दौऱयानंतर दोन्ही देशांच्या वतीने पहिली उच्चस्तरीय बैठक ठरणार आहे.
तालिबानला बोलावणे नाही
नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ात होणाऱया या बैठकीसाठी भारताने तालिबानला बोलावणे धाडलेले नाही. पण 20 ऑक्टोबर रोजी रशियात होणाऱया मॉस्को फॉर्मेटच्या चर्चेसाठी तालिबानला निमंत्रित करण्यात आले आहे. यात भारतही भाग घेणार आहे. भारत सरकार तालिबानला स्वतःच्या देशात निमंत्रित करण्यासंबंधी खबरदारी बाळगत आहे, कारण तालिबानी राजवटीने अफगाणिस्तानात सर्वांच्या अधिकारांचा सन्मान करणे आणि सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याच्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मागणीवर अद्याप कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही.