काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप घरवापसी
नवी दिल्ली, काबूल / वृत्तसंस्था
भारताने अफगाणिस्तानातून जवळपास चारशे नागरिक मायदेशी आणले आहेत. तीन विमानातून एकूण 392 जणांना भारतात आणण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून रविवारी सायंकाळी देण्यात आली. मायदेशी परतल्यावर नागरिकांच्या चेहऱयांवर आनंद दिसून येत होता. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्याठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारतीय वायुदलाच्या आणि एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून भारतीयांची घरवापसी केली जात आहे.
एअर इंडियाच्या विशेष विमानातून 87 भारतीय आणि 2 नेपाळी नागरिकांना दुशानबे येथून दिल्लीत आणण्यात आले आहे. त्यांना शनिवारी काबूलहून ताजिकिस्तानच्या राजधानीत हलवण्यात आले होते. रविवारी त्यांना तेथून दिल्लीला आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. 135 भारतीयांच्या अन्य एका गटालाही शनिवारी काबूलहून अमेरिका आणि नाटो विमानाच्या मदतीने दोहा येथे नेण्यात आले होते. दोहातून या नागरिकांनाही भारतात आणण्यात आले आहे.
हिंडेन विमानतळावर उतरलेल्या भारतीय लष्कराच्या सी-17 या मालवाहू विमानातून 107 भारतीय आणि 23 अफगाणी नागरिकांना दिल्लीत आणण्यात आले आहे. थेट काबूलहून 168 नागरिकांना घेऊन येणारे विमानही भारतात आले आहे. त्यात अफगाणिस्तानातील खासदार अनारकली होनारयार आणि नरेंद्रसिंग खालसा आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. दरम्यान, हवाईदलाचे आणखी एक विमान काबूलहून 168 जणांना भारतात घेऊन येण्यासाठी निघाले असल्याचेही वृत्त आहे. आणखी काही दिवस हे घरवापसीचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचे समजते. सध्या अमेरिकन सैन्य काबूल विमानतळावर दाखल असून त्यांच्याकडून भारताला रोज दोन विमान फेऱयांना परवानगी दिली आहे. अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना अमेरिकादेखील काबूल विमानतळावरून परत आणत आहे. सध्या काबूल विमानतळावर जवळपास पाच हजाराच्या संख्येने अमेरिकन व नाटो सैन्य दाखल आहे.
विमानात ‘भारत माता की…’चा जयघोष
शनिवारी 150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त आल्यानंतर भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला. एअर इंडियाच्या विमानातून भारताच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ असा एकच जयघोष विमानामध्ये झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामामध्ये ताजिकिस्तानमधील भारतीय दुतावास महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
भारतात पाऊल ठेवताच खासदारांना अश्रू अनावर
अफगाणिस्तानच्या संसदेत खासदार असलेले नरेंद्रसिंग खालसा यांना भारतात सुरक्षित परत आल्यानंतर अश्रू अनावर झाले. दिल्लीत त्यांचे विमान लँड होताच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या वीस वर्षात भारतीयांच्या आणि अन्य जगाच्या मदतीने अफगाणिस्तानने जे कमावले ते गेल्या आठ दिवसात सगळे गमावले आहे. आता सगळे संपले आहे. अफगाणिस्तानात वीस वर्षात शांतता, सहिष्णुता यांचे राज्य होते. सर्व समुदाय एकमेकांमध्ये मिळून-मिसळून राहत होते, परंतु आता तालिबानच्या राजवटीत हे सगळे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. तिथे असुरक्षितता वाटत असल्यामुळे आम्ही आता भारतात आलो आहोत, असे सांगत असताना खासदार नरेंद्रसिंग खालसा यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.