दुष्काळाला तोंड देणाऱया देशात संघर्ष अन् पलायन तीव्र होणार
अफगाणिस्तानात हवामान बदल तेथील संघर्षाला अधिकच खतपाणी घालू शकते. येथील काही हिस्से जागतिक सरासरीच्या दुपटीपेक्षा अधिक उष्ण आहेत. तर पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. शेतीसाठी उपयुक्त उत्तर आणि पश्चिमेकडील भाग 3 वर्षांमध्ये दुसऱयांदा दुष्काळाला तोंड देत आहेत.
तीन-चतुर्थांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. एखादे अनपेक्षित हवामान आपत्ती आणणारे ठरेल, विशेषकरून देशात स्थिर सरकार नसल्यास हे संकट विक्राळ होणार आहे. देशातील एक तृतीयांश लोक अन्नसंकटाला तोंड देत असल्याचे विधान काबूल विद्यापीठातील प्राध्यापक नूर अहमद अखुंदजादा यांनी केले आहे.
गव्हाचे 40 टक्के पिक नष्ट
युद्धामुळे अनेक लोकांना बियाणे पेरता आलेले नाही. दुष्काळामुळे पिक हातातून जाणे निश्चित आहे. 40 टक्के पिक वाया गेले असून गव्हाच्या किमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हवामान बदलाच्या सर्वाधिक तडाखा 25 देशांना बसला असून यात संघर्ष आणि अशांततेची स्थिती असलेले देश देखील असल्याचे जागतिक अन्न कार्यक्रमाचे म्हणणे आहे. उष्णता आणि दुष्काळामुळे अफगाणिस्तान मुलांसाठी जगाचा 15 वा सर्वात जोखिमीचा देश आहे. येथील 20 लाख मुले कुपोषित आहेत.
होर्डिंगवरून महिलांना हटविण्यावर भर
समस्या संपुष्टात आणण्याऐवजी तालिबान सध्या होर्डिंगवरून महिलांना हटविण्याकरता अधिक सक्रीय आहे. जलव्यवस्थापन नागरिकांसोबत तालिबानच्या वैधतेसाठी महत्त्वाचे असेल. तेथे पाणी हा नेहमीच मोठा मुद्दा राहिला आहे. तालिबानकडून हेरात शहराच्या धरणावर वारंवार हल्ले करण्यात आले आहेत. 2018 च्या दुष्काळात 3.71 लाख अफगाण नागरिकांना स्वतःचे घर सोडावे लागले होते.
क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक
अफगाणिस्तानात बँकिंग यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. या आर्थिक संकटादरम्यान काही अफगाणी नागरिक क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करत आहेत. अफगाणिस्तानात याचा वेगाने वापर वाढला आहे. 2021 च्या ग्लोबल क्रिप्टो एडॉप्शन इंडेक्समध्ये अफगाणिस्तान 20 व्या क्रमांकावर आहे.
अफूची शेती
हा दुष्काळ अफूची शेती बंद करण्याच्या तालिबानच्या आश्वासनासमोर अडथळा निर्माण करणारा आहे. अफूकरता गहू, टरबूजच्या तुलनेत कमी पाणी लागते आणि अधिक नफा मिळवून देणारी ही शेती आणि या शेतीतून दरवर्षी सुमारे 2,928 कोटी रुपये प्राप्त होतात, याच रकमेतून तालिबान समृद्ध झाला आहे. कतार आणि चीनसारख्या देशांकडून मान्यता मिळविण्यासाठी तालिबान अफूचा वापर करू इच्छितो असे विश्लेषकांचे मानणे आहे.