वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील स्थिती संदर्भात अमेरिकेचे विदेशमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या समवेत चर्चा केली आहे. दोन्ही देश अफगाणिस्तानसंबंधीची भूमिका ठरविताना एकमेकांना विश्वासात घेतील. तसेच काबूल विमानतळाच्या नियंत्रणावरही त्यांनी चर्चा केली.
31 ऑगस्टनंतर 1 सप्टेंबरपासून काबूल विमानतळाचा पूर्ण ताबा तालिबानकडे जाणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टच्या आत आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्यासाठी सर्व महत्त्वाचे देश प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने गेल्या 24 तासात 6000 हून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे. फ्रान्स आणि ब्रिटननेही सुटका अभियान संपल्याचे घोषित केले आहे. जर्मनीने 31 ऑगस्टपर्यंत सुटका अभियान संपविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनतर सर्व प्रगत देश तालिबानच्या पुढच्या पावलांवर लक्ष ठेवणार आहे. जी 7 देशांच्या परिषदेत अफगाणिस्तानातील परिस्थितीबद्दल विचार झाला असून समान भूमिका घेण्याचे ठरले आहे. काबूलचा पाडाव इतक्या सहजासहजी होईल अशी अपेक्षा नव्हती. अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानातील नागरिक नाव जाहीर न करण्याच्या अटीवर करत आहेत.