अफगाणिस्तानात जेव्हा जेव्हा परिस्थिती चिघळते तेव्हा तेव्हा त्याचे पडसाद काश्मीरात उमटलेले पाहायला मिळतात असं आजवर दिसून आलंय…या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा ‘तालिबान’बरोबरचा ‘शांतता करार’ अखेर मार्गी लागला असून त्यानंतर अनेक विश्लेषकांनी जसा अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणं अफगाण भूमीतील स्थिती पुन्हा एकदा बिघडण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसू लागलीत. अपेक्षेप्रमाणं या घडामोडीचे विपरित परिणाम काश्मीरातही जाणवू लागलेत…
‘तालिबान’नं पुन्हा एकदा अक्षरशः मूर्ख बनविलंय अमेरिकेला…त्या दहशतवादी संघटनेनं ‘शांतता करारा’च्या वेळी महासत्तेला ठाम आश्वासन दिलं होतं ते ‘अल-कायदा’शी कुठल्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचं. परंतु ‘तालिबान’नं त्या वचनाला अपेक्षेनुसार लाथ मारलीय…‘संयुक्त राष्ट्रां’च्या ‘सुरक्षा परिषदे’च्या एका अहवालात हल्लीच हे स्पष्ट करण्यात आलंय…‘तालिबान’मधील ‘हक्कानी नेटवर्क’ गट व ‘अल-कायदा’ यांच्यातील संबंध अजूनही दृढ असून अमेरिकेशी चर्चा चालू असताना देखील दोन्ही उग्रवादी संघटनांचं एकमेकांना सल्ला देण्याचं काम इमाने इतबारे सुरू होतं. खेरीज ‘तालिबान’नं ‘अल-कायदा’ला शब्द दिलाय तो त्यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना धक्का न देण्याचा’, अहवालातील शब्द…
अहवालातील मतानुसार, अफगाणिस्तानातील ‘अल कायदा’ संघटनेत विदेशी उग्रवाद्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असून त्या देशात वास्तव्य आहे ते सुमारे 6 हजार 500 पाक दहशतवाद्यांचं…खेरीज पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या अत्यंत खतरनाक अतिरेकी संघटना अफगाणिस्तानमधील उग्रवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात…अहवालाप्रमाणं, नवी दिल्लीनं इस्लामाबादचं वर्णन पुन्हा एकदा ‘दहशतवाद्यांचं मुख्य केंद्र’ असं केलंय. भारतानं नेहमीच ‘तालिबान’शी अधिकृतरीत्या चर्चा करण्यास नकार दिलाय, कारण नवी दिल्लीच्या मते, ‘तालिबान’ म्हणजे पाकचं समर्थन लाभलेली नि पाकिस्ताननं पुरस्कृत केलेली उग्रवादी संघटना…‘अल-कायदा’नं अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील ‘शांतता करारा’चं स्वागत केलंय, पण त्यांच्या मतानुसार, ‘करार’ म्हणजे ‘तालिबान’ अन् ‘आंतरराष्ट्रीय जिहाद’ यांचा विजय…असो !
अफगाणिस्तानमधील बिघडणाऱया, खतरनाक बनलेल्या सुरक्षासंबंधीच्या परिस्थितीचा जम्मू व काश्मीरमधील वातावरणावर प्रभाव पडतोय ?…या प्रश्नाचं उत्तर निःसंशय ‘होय’ असंच द्यावं लागेल. काश्मीरमधील हिंसाचारानं गेल्या काही महिन्यांत पुन्हा एकदा डोकं वर काढलंय…काबूलमधील गोंधळ म्हणजे तेथील हिंसाचाराला आमंत्रणच…अमेरिका व ‘तालिबान’ यांच्यातील ‘शांतता करारा’मुळं जम्मू व काश्मीरला कदाचित थोडय़ाफार प्रमाणात तोंड द्यावं लागेल ते 1989-90 सालच्या परिस्थितीला. कारण महासत्तेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून परतल्यानंतर तिथं खात्रीनं दर्शन घडेल ते रक्तरंजित थैमानाचं…
1989 वर्ष आठवतंय ?…तत्कालीन ‘सोव्हिएत युनियन’नं माघार घेतल्यानंतर आमंत्रण मिळालं ते ‘डेडली’ गृहयुद्धाला आणि त्याचा अगदी आरामात लाभ मिळाला तो ‘तालिबान’ला. मग दर्शन घडलं ते त्या क्रूर उग्रवादी संघटनेनं केलेल्या महाभयानक कत्तलींचं…परंतु 2020 म्हणजे 1989-90 नव्हे हे ‘कोरोना व्हायरस’नं यापूर्वीच सिद्ध केलंय. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे वातावरण 360 अंशांत फिरलंय…भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास सध्या शंभर टक्के सज्ज असून नवी दिल्लीला एखाद्या दहशतवादी गटाचे तीन तेरा वाजविण्यास वेळ लागणार नाहीये…
अनेकांना वाटतंय की, करारानुसार विदेशी सैन्य अफगाणिस्तानमधून परतल्यानंतर ‘तालिबान’ला सुवर्णसंधी मिळेल ती काबूलवर राज्य करण्याची. शिवाय पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ला (आयएसआय) देखील मोठय़ा प्रमाणात आधार मिळेल तो ‘तालिबानी दहशतवाद्यांचा. पाक या घातक अस्त्राचा वापर जम्मू-काश्मीरमध्ये केल्याशिवाय अजिबात राहणार नाहीये. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांची संख्या वाढल्यास, उग्रवाद वाढल्यास आश्चर्यचकीत होण्याची गरज नाही. निसर्गसौंदर्यासाठी साऱया विश्वात प्रसिद्ध असलेल्या त्या केंद्रशासित प्रदेशात सध्या सुमारे 250 अतिरेकी वावरताहेत (याउलट 30 वर्षांपूर्वी धुडगूस चालू होता तो जवळपास 7 हजार दहशतवाद्यांचा)…
इस्लामाबादला ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुद्धा स्वप्नं पडताहेत ती जम्मू व काश्मीरला घशात घालण्याची, अस्थिर बनविण्याची, तिथं हिंसाचाराचा आगडेंब उसळविण्याची. कारण त्या कपटी राष्ट्राला शांत, स्थिर भारत पाहणं अक्षरशः शक्य होत नाहीये. पाकला अजूनही वाटतंय की, काश्मीरमधील जनतेच्या समर्थनाच्या जेरावर नवी दिल्लीला नमविणं अशक्य नाही. त्याखेरीज तो देश आपल्याविरुद्ध ‘पीर-पंजाल’ प्रदेशाचा वापर करण्याचं चित्रही रेखाटतोय. त्यांच्या आडाख्यानुसार, अफगाणी, पाकिस्तानी नि स्थानिक उग्रवाद्यांच्या साहाय्यानं जम्मू-काश्मीरमध्ये अशांततेला जन्म देणं कठीण नाहीये. पाकला त्या राज्याच्या अंतर्गत भागांना धडक द्यायचीय, जनतेचं मन भारताच्या विरुद्ध लढण्यासाठी वळवायचंय…
काबूल सध्या अस्थिरतेच्या ज्वालांत होरपळतोय…पण जर अफगाणिस्तानचं राष्ट्रीय लष्कर व ‘तालिबान’ यांनी हस्तांदोलन करण्याचा अतिशय विचित्र निर्णय घेतला, तर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘प्रॉक्सी वॉर’ला जन्म देणं इस्लामाबादला जास्तच सोपं होईल…तीन दशकांपूर्वीचा विचार केल्यास त्यावेळी आपल्या लष्कराला श्वास घेण्याची सुद्धा फुरसत मिळत नव्हती…कारण सैनिक श्रीलंकेपासून पंजाबपर्यंत अक्षरशः धावत होते. खेरीज खदखदणारा ईशान्य भारतही भूदलाच्या कवेत होता. त्यावेळी काश्मीरवर लक्ष केंद्रीत केलं होतं ते केवळ एकमेव ‘डिव्हिजन’नं अन् तिला साथ मिळत होती ती दोन स्वतंत्र ‘बिग्रेड्स’ची. आपल्या ‘15 व्या कोअर’वर जबाबदारी होती ती पूर्व लडाखमधील ‘डेमच्यूक’पासून ‘पीर पंजाल’पर्यंत पहारा देण्याची. शिवाय डोक्यावर तलवार लोंबकळत होती ती चीनबरोबरची ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ अन् पाकबरोबरची ‘नियंत्रण रेषा’ यांची. सारं चित्र आमूलाग्र बदललं ते 1999 सालच्या ‘कारगिल’ युद्धानंतर…
जन्मू व काश्मीरमधील तत्कालीन पोलिसांचा विचार केल्यास त्यांच्यात दहशतवाद्यांना तोंड देण्याचा आत्मविश्वासच नव्हता. शिवाय उग्रवाद्यांवर प्रतिहल्ला करण्यासाठी एखाद्या भक्कम डावपेचाला देखील तयार करणं जमत नव्हतं…परंतु सध्या ‘15 वी कोअर’ व ‘जम्मू-काश्मीर पोलीस’ यांना झुंजण्याचा 30 वर्षांचा अनुभव असून त्यांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देणं कठीण वाटत नाहीये…दुसऱया नि तिसऱया ‘टियर्स’ची जबाबदारी अतिशय घातक ‘राष्ट्रीय रायफल्स’वर सोपविण्यात आलीय. काश्मीर खोऱयात आपलं दोन तृतियांश भूदल असून त्यांनी सारं लक्ष केंद्रीत केलंय ते राज्यातील स्थिरतेवर आणि स्थानिक जनतेशी संबंध सुधारण्यावर. त्याखेरीज खतरनाक ‘सीआरपीएफ’ सज्ज असून त्यांनी ‘राष्ट्रीय रायफल्स’च्या साहाय्यानं उग्रवाद्यांचे तीन तेरा वाजविण्याचं काम इमाने इतबारे केलंय…
घुसखोरी, दहशतवाद, असंतुष्ट नागरिकांची मोहीम आणि ‘सोशल मीडिया’ व काही मशिदींतून करण्यात येणारा भारतविरोधी प्रचार यांच्या साहाय्यानं पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील वातावरण उग्र बनवू शकेल…भारतानं टेहेळणी करण्याचं आधुनिक तंत्रज्ञान अन् ‘नियंत्रण रेषे’वरचं कुंपण यांच्या आधारे 2004 पासून घुसखोरीवर बऱयापैकी वर्चस्व मिळविलंय. नवी दिल्लीला यश मिळालेलं असलं, तरी खडबडीत डोंगराळ भागांच्या जोरावर घुसखोरी अजूनही नेटानं चालतेय. भारतात घुसलेल्या उग्रवाद्यांना भक्कम साहाय्य मिळतंय ते पाकच्या येथील हस्तकांचं…या पार्श्वभूमीवर आपले सैनिक प्रतिहल्ला करताहेत ते नवीन ‘हायब्रिड कॉनफ्लिक्ट स्ट्रटेजी’च्या साहाय्यानं…
भारतीय सैन्यात जन्मू-काश्मीरमधील युवकांनी मोठय़ा प्रमाणात प्रवेश मिळविलाय. विदेशी अतिरेकी संघटना व पाकच्या योजनांना त्यामुळं अक्षरशः दणका बसलाय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. जर इस्लामाबाद हिंसाचाराला जन्म देण्यासाठी अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांवर येऊ घातलेल्या दिवसांत अवलंबून असेल, तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांना यश मिळण्याची शक्यता कमीच. कारण 90 सालचा आपला अनुभव स्पष्टपणे सांगतोय की, त्या डावपेचाला मोठय़ा प्रमाणात मर्यादा असून डोकं चालविण्याची फारशी सवय नसलेल्या परदेशी उग्रवाद्यांना त्याची अंमलबजावणी करणं शक्य होत नाही…नवी दिल्लीला जम्मू व काश्मीरमध्ये यशस्वी होण्यासाठी साहाय्य घ्यावं लागेल ते तेथील सर्वसामान्य जनतेचं. शिवाय पाकिस्तानच्या भारताच्या दिशेनं वाहणाऱया आर्थिक नदीला अडविणं, ‘पाक रेंजर्स’च्या हल्ल्यांना निष्फळ करणं आणि तिखट प्रतिहल्ल्यांना जन्म देणं अशीही कामगिरी बजावावी लागेल !
– राजू प्रभू