वार्ताहर/ कराड
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने कारवाई करून प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमण तातडीने हटवावे. अन्यथा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत राज्य सरकारला सूचना करण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली. यावेळी हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपजिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, राहुल यादव, प्रकाश जाधव, शानबाग हिंदुराव पिसाळ, गणेश पाटील, अजय पावसकर, सागर काळे, गणेश माने, महेश डांगे उपस्थित होते.
विक्रम पावसकर म्हणाले, महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या अफजल खान रुपी राक्षसाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भीमरुपी पराक्रमाची नोंद देशाच्या इतिहासात झाली. दुर्दैवाने आज त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न काही धर्मांधांकडून केला जात आहे. अशा समाजविघातक प्रवृत्तींना पायबंद करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण तत्काळ जमीनदोस्त करण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाला आपण कराव्यात व उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, असे मत विक्रम पावसकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे व्यक्त केले.