प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीत झेंडूच्या फुलांच्या गगनाला भिडलेल्या दरांनी भाविकांचा खिसा चांगलाच रिकामा लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून झेंडूची फुले कमी प्रमाणात आल्यामुळे व पावसामुळे उत्पन्नावरही परिणाम झाल्याने 60 ते 80 रुपये दरांने मिळणारी ही फुले तब्बल 400 रुपये किलोने विकली जात आहेत.
कोरोनातील टाळेबंदीत वाहतुकीत निर्माण झालेले अडथळे आणि अतिवृष्टीने झेंडूच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सवासह हरतालिका, ऋषी पूजन, गौरी पूजन यासाठी झेंडु, लिली, निशिगंध आदी फुलांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. रत्नागिरीत कोल्हापूरसह मुंबई, पुणे मार्केटमधून फुलाचा पुरवठा होतो.
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी बाजारात दोन ते तीन टन झेंडू आणला जातो. सर्वसाधारणपणे 80 ते 100 रुपये किलो दराने त्याची विक्री होते. यंदा मात्र किलोचा दर 400 रुपयांवर गेला आहे. 10 रुपयांचा हार 40 ते 50 रुपयांनी विकला जात आहे. मोठे हार 300 रुपयांपर्यंत विकले जात असल्याने ग्राहकांना भूर्दंड सहन करावा लागत आहे.