ऑनलाईन टीम / मुंबई :
गोवा विधानसभेची जबाबदारी चोखपणे पार पाडत काँग्रेसला धूळ चारणारे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई भाजपच्या वतीने आज फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी कोणत्याही विजयाने हुरळून जाऊ नका. विजयाने नम्र व्हायचे आहे. अब असली लढाई तो मुंबई में होगी, असे म्हणत फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
फडणवीस म्हणाले, जनतेचा भाजपवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. उत्तरप्रदेशसह चार राज्यात भाजपने विराट विजय मिळवला आहे. हा जनतेचा विजय आहे. कार्यकर्त्यांनी या विजयाने हुरळून जायचं नाही. विजयाने नम्र व्हायचे आहे. अधिक मेहनत करायची आहे. अब असली लढाई तो मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. पण भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. मुंबई भ्रष्टाचारमुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला दम घेता येणार नाही.
मी केवळ प्रतिनिधी म्हणून गोव्याला गेलो होतो. खरी जादू पंतप्रधान मोदींनी केली. गोव्याच्या विजयासाठी मी महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. चंद्रकांत पाटील यांनी जी महाराष्ट्रातून सेना गोव्यात पाठवली. या विजयामध्ये या महाराष्ट्राच्या या सेनेचाही मोठा फायदा झाला.