विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
महाविद्यालये, माध्यमिक शाळा आता सुरू झाल्या आहेत. मात्र विविध समस्या विद्यार्थ्यांना भेडसावू लागल्या आहेत. त्या समस्या दूर करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
विद्यार्थ्यांना बसपास, वसतिगृह, शिष्यवृत्ती अजूनही देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. तेव्हा तातडीने विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र बसपास वितरणामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने या समस्या सोडवाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी किरण दुकानदार यांच्यासह इतर विद्यार्थी उपस्थित होते.