प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या परिस्थितीत राज्यातील उच्च शिक्षणाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिष्टमंडळाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची भेट घेण्यात आली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्यातील विद्यापीठाच्यावतीने ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले असले तरी 20 ते 25 टक्के विद्यार्थ्यांना याचा उपयोग झालेला नाही. विशेषत: ग्रामीण भाग आणि नेटवर्करहित भागातील विद्यार्थी ऑनलाईन वर्गापासून वंचित राहत आहेत. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, संबंधित विद्यापीठांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना याबाबत आवश्यक सूचना करणे गरजेचे आहे. ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले असले तरी लॉकडाऊननंतर 20 ते 25 दिवसांच्या कालावधीसाठी पुनरावर्तन (रिव्हीजन) वर्ग भरविण्यात यावेत. सध्या अनेक विद्यापीठांतील वसतिगृहांचा वापर क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आला आहे. यामुळे या वसतिगृहांची स्वच्छता आणि सॅनिटायझर करण्यात यावे. कोणत्याही विद्यापीठात आरोग्य केंद्र नसल्याने आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात यावी. विद्यार्थ्यांचा बसपास कालावधी मे-जूनमध्ये संपणार आहे. यामुळे या शैक्षणिक वर्षातील परीक्षा संपेपर्यंत बसपासचा कालावधी वाढविण्यात यावा आणि विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बसव्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये
कोणत्याही महाविद्यालयाने पुढील शैक्षणिक वर्षातील शुल्कात वाढ करू नये, असा आदेश देण्यात यावा. शिल्लक राहिलेले विद्यार्थीवेतन तात्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे. राज्यातील अनेक अनुदानरहित महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले असून, हे वेतन तात्काळ मंजूर करण्याचा आदेश देण्यात यावा. शिक्षणमंत्री आणि समाजातील काही तज्ञ मंडळींद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मानसिक धैर्य द्यावे. आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांमध्ये कौन्सिलिंग केंद्रांची सुरुवात करण्यात यावी. सामाजिक अंतर राखण्याबरोबरच अन्य नियमांचे पालन करून गटाप्रमाणे परीक्षा घेण्याची योजना आखावी. राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि सर्व विद्यापीठांना योग्य सूचना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
अभाविपचे राष्ट्रीय कार्यदर्शी हर्ष नारायण, क्षेत्रिय सहसंघटक कार्यदर्शी स्वामी मरळापूर, राज्य संघटक कार्यदर्शी जयप्रकाश, प्रांत कार्यदर्शी सूरज पंडित यांच्यासह विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाच्यावतीने डॉ. अश्वथ नारायण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.