आपचे सांगेवासियांना आवाहन : पायाखालची जमीन सरकल्याने विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे काम
प्रतिनिधी /सांगे
सांगे मतदारसंघाचे आपचे उमेदवार अभिजित देसाई यांचा विजय विरोधकांना दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विरोधकांनी देसाई यांच्याविरुद्ध अपप्रचार चालवला आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन आपचे सांगे अध्यक्ष मिल्टन फर्नांडिस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी आपचे उमेदवार देसाई, संदीप नाईक, नेत्रावळीचे पंच प्रकाश भगत, जेम्स आंताव, रियाज शेख व इतर मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना आपचे उमेदवार देसाई म्हणाले की, सरकारने ऊस उत्पादकांची फसवणूक केली आहे. या गळीत हंगामात ऊस उत्पादकांनी 20 हजार मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन केले. आजपर्यंत केवळ सात हजार टन ऊसाची वाहतूक केली गेली आहे. बाकी ऊस अजूनही भूखंडांत उभा आहे. डिसेंबरला ऊस उत्पादकांचे पैसे देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. पण ऊस उत्पादकांच्या खात्यांमध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. ऊस उत्पादकांचा पैसा सरकारने त्यांच्या खात्यांत जमा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आपचे सरकार गोव्यात आले, तर संजीवनी साखर कारखाना नव्याने सुरू करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. खाण व्यवसायाविषयी बोलताना ते म्हणाले की, गोव्यात खाण व्यवसाय सुरू असताना केवळ राजकर्त्यानीच आपल्या तिजोऱया भरल्या, पण जनतेला काहीच फायदा झाला नाही. आम आदमी पक्षाला गोव्यात भवितव्य आहे. या पक्षाची तत्त्वे व धोरण पाहूनच आपण या पक्षाकडे आकर्षित झालो. भाजप व काँग्रेस पक्षामध्ये मतभेद आहेत. आपण काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी काम केले आहे. आप हा असा एक पक्ष आहे जो गोवेकरांना न्याय मिळवून देईल, असे त्यांनी पुढे सांगितले.
कोणाकडून एक पैसाही घेतलेला नाही
आपल्यावर काही विरोधकांकडून कोटी रुपये घेतल्याच्या होणाऱया आरोपाचे खंडन करताना देसाई म्हणाले की, आपण कोणाकडूनही एक पैसा घेतलेला नाही. आपल्याला मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे हे विरोधकांना पाहवत नाही. हे सर्व काही त्यांनीच रचले आहे. विरोधकांनी रचलेल्या अफवांना मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
संदीप नाईक म्हणाले की, आपचे उमेदवार देसाई यांच्यावर आमचा व अन्य कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. देसाई यांना तीन कोटीच काय, शंभर कोटी दिले, तरी ते हलणारे नाहीत. गोव्यात दिल्लीसारखे सरकार आणण्यासाठी अभिजित देसाई यांना भरघोस मतांनी निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.