राजेंद्र म्हापसेकर यांचा नागेंद्र परब यांना सवाल : ऍम्बुलन्सबद्दल जि. प. अध्यक्षांचे केले होते अभिनंदन
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ाला बारा ऍम्ब्युलन्स दिल्याबद्दल नागेंद्र परब यांनी जि. प. अध्यक्षांचे केलेले अभिनंदन ही उपहासात्मक टीका असल्याचा आरोप जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला आहे. नागेंद्र परब यांनी जि. प. अध्यक्षांचे अशा प्रकारे उपहासात्मक अभिनंदन करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
खनिकर्मच्या निधीतून जिल्हय़ाला बारा ऍम्ब्युलन्स मंजूर करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे हा निधी आल्याने याबाबत जि. प. अध्यक्षांनी बारा ऍम्ब्युलन्स घेतल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या ऍम्ब्युलन्स पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे सांगत नागेंद्र परब यांनी जि. प. अध्यक्षांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे अभिनंदन केले होते. या अभिनंदन करण्याच्या कार्यपद्धतीबाबत म्हापसेकर यांनी समाचार घेतला आहे.
जिल्हा परिषद नेहमीच लोकाभिमुख धोरण राबवत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व आम्ही सहकारी लोकाभिमुख कामकाज करीत आहोत. मुळात हीच गोष्ट विरोधी पक्षातील लोकांना खटकत असावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुळात शासनाकडून जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका यापूर्वीच कोरोनाच्या पहिल्या लाटेत मिळणे आवश्यक होते. परंतु शासनस्तरावरून याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप म्हापसेकर यांनी केला. वेळीच दखल न घेतल्याने मागील वर्षभरापासून वेळोवेळी जिल्हा परिषद सभांमध्ये, जिल्हा नियोजन समिती सभेमध्ये खनिकर्म विभागाकडील निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळण्यासाठी स्वतः आपण व आपल्या सहकाऱयांनी मागणी केली होती. तसेच शासनस्तरावरून या रुग्णवाहिका न आल्याने चौपदरीकरण काम करणाऱया डी. बी. एल. व के. सी. एल. या कंपन्यांच्या सी. आर. फंडातून देण्याबाबत वेळोवेळी ठराव घेण्यात आले आहेत.
खनिकर्म विभागाकडे जमा होणारा निधी हा मोरगाव, रेडी, कळणे, कासार्डे अथवा मायनिंग पट्टय़ातील गावांतून येणाऱया रॉयल्टीतून जमा होतो. त्यामुळे खऱया अर्थाने खनिकर्म निधी हा त्या भागातील विकासावर खर्च करणे आवश्यक आहे. शासनाकडून जिल्हय़ातील आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने सदरचा निधी आरोग्य यंत्रणेसाठी वापरण्याबाबत जिल्हा परिषदेने वेळोवेळी जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले होते. याचेच फलित म्हणून खनिकर्म विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी बारा रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या. याचा सर्व निधी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे हस्तांतरित झाला असून विभागाकडून खरेदीबाबतची प्रक्रिया राबवण्यात आली आहे, असे ते म्हणाले.