भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला अमिट ठसा उमटवणारे ज्ये÷ अभिनेते दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेला हा अभिनयाचा प्रवाह आता खंडित झाला आहे. त्यांच्या अभिनयाची नक्कल करून अनेकांनी या क्षेत्रात नाव कमावले. दिलीप कुमार यांना स्वीकारण्यासाठी सिनेसृष्टीने सुरुवातीला अपयशाचे दिवस दाखवले. पण पुढे तीच व्यक्ती ‘लार्जर दॅन लाईफ’ बनली. ट्रजिडी किंग नावाचा मुकुट त्यांच्या शिरावर ठेवला. त्यांचे केवळ नाव हीच त्यांचा परिचय बनली तर इतरांच्या कामालाही त्यांचे केवळ नाव ही उपाधी ठरली. अशा अभिनयाचा सम्राटाने वयाच्या चौदाव्या वषीपर्यंत चित्रपट पाहिला नव्हता. पहिला चित्रपट पाहिला तोसुद्धा युद्धपट! स्वातंत्र्यपूर्व भारतात पेशावर (फाळणीनंतर पाकिस्तानात) हे त्यांचे मूळ स्थान. त्यांचे कुटुंब नाशिकजवळच्या देवळाली भागात वास्तव्यास राहिले. कौटुंबिक फळविक्रीचा व्यवसाय आणि अभिनय यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. अशा स्थितीत युसूफ खान या क्षेत्रात आले. तो काळ अभिनेत्याला स्टारडम मिळवून देण्यासाठी भारदस्त नाव देण्याचा होता. त्यातूनच पृथ्वीनाथ कपूरना चित्रकर्त्यांनी पृथ्वीराज बनवले. कुमुदलाल गांगुलींचा अशोक कुमार झाला. तसेच 1944 साली आलेल्या बॉम्बे टॉकीजच्या ज्वार-भाटा चित्रपटासाठी युसूफ खान ऐवजी वासुदेव, जहांगीर आणि दिलीप कुमार या तीन रोमँटिक नावापैकी दिलीपकुमार हे नाव निश्चित करण्यात आले. अभिनय कसा करावा या प्रश्नावर अशोक कुमार यांचा सल्ला दिलीप कुमार यांनी मानला. वाटय़ाला आलेले पात्र जसे जगले, वागले असते असे वाटते तसा अभिनय करायचा हे त्यांनी पक्के केले आणि जगभरातील चित्रपट आणि अभिनेत्यांचा बारकाईने अभ्यास करून आपली स्वतःची एक शैली निर्माण केली. 1947 साल त्यांच्यासाठी आणि त्यांचे चित्रपट जुगनू, मिलन यांच्यासाठी यशदायी ठरले. 48 सालातील शहीदने त्यांना ट्रजेडी किंगची वाट दाखवली. 1950 ते 55 या काळातील जोगन, दीदार, अमर आणि प्रचंड लोकप्रिय झालेला देवदास या चित्रपटांनी त्यांना तो मुकुट शिरावर घालायलाच लावला. शरदचंद्र यांच्या कादंबरीवर आतापर्यंत डझनभर देवदास चित्रपट बनले आहेत. मात्र बिमल रॉय दिग्दर्शित आणि दिलीपकुमार अभिनीत देवदासची सर कोणालाही नाही. या ठरावीक साच्याच्या भूमिकेच्या सापळय़ात आपण अडकत चाललो आहोत असे या अभिनेत्याला वाटू लागले. जन्मच दुःख सहन करण्यासाठी झाला आहे अशी मानसिक भावना झाल्यानंतर या ट्रजिडी किंग सिंड्रोममधून आपण बाहेर पडले पाहिजे म्हणून त्यांनी परदेशात उपचार घेतले. डॉक्टर आणि अभिनय क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून हलके-फुलके चित्रपट करण्याचा निश्चय केला आणि त्यानंतर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला अनेक यशस्वी वळणे मिळाली. 1957 साली आलेला नया दौर आणि 58 साली आलेला मधुमती यांनी प्रेक्षकांना एक लोभस नायक दिला. स्वातंत्र्यानंतर बदलत्या आणि नव्याने विकसित होत असलेल्या भारताचे प्रतिबिंब नया दौर, अंदाज, लीडरमध्ये दिसते. तसाच उत्साहाने भरलेला नायकही दिसतो. राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार ही समकालीन त्रिमूर्ती भारतीय चित्रपट रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आहे. राज कपूरचे ते भोळेभाबडे रूप, देव आनंदची चिरतरुण अदा आणि दिलीप कुमारचा चेहऱयावरील प्रत्येक अवयवाचा प्रभावी वापर करून संवादाविनाही प्रभाव पाडणारा अभिनय सर्वकालीन भारतीय रसिकांच्या मनात घर करून राहणार आहे. त्या त्रिमूर्तीतील अखेरचा दुवा आज निखळला आहे. जहांगिर असो की वासुदेव, दिलीप कुमार या नावाऐवजी यापैकी कोणतेही नाव असते तरी भारतीय चित्रपट सृष्टीचा तो आखरी मुगल चमकूनच उठला असता. भारतीय चित्रपटसृष्टीत सदासर्वकाळ ज्याचा बोलबाला राहील तो मुगले आझम चित्रपट आणि बंडखोरप्रेमी राजपुत्र सलीम पृथ्वीराज कपूर यांच्या रूपातील अकबरासमोर उभा राहून जो संवाद करतो त्याला तोड नाही. आयुष्यात जिच्या बरोबर दीर्घकाळाचे प्रेमसंबंध तुटले त्या मधुबालासोबत चित्रित केलेले प्रेमप्रसंग त्यांनाही तोड नाही. सात-आठ वर्षे सातत्याने त्यांच्या निधनाची अफवा उठायची. पण या महानायकाच्या जीवन आणि मृत्यू दरम्यान त्यांच्या पत्नी सायरा बानो उभ्या होत्या. त्यांच्या सेवा शुश्रुषेमुळेच दिलीपकुमार गेले दशकभर मृत्यूला हुलकावणी देत होते. सायरा बानू आणि दिलीपकुमार या जोडीवरदेखील भारतीय चित्रपट रसिकांनी अतोनात प्रेम केले. दिलीपकुमार यांच्या आयुष्याचा त्या खऱया अर्थाने धागा बनल्या. त्यामुळे आज हा महानायक कालनिदेत शांतपणे निद्रिस्त होताना त्यांना जपणाऱया त्यांच्या पत्नीचे अप्रूप वाटले नसते तरच नवल. केवळ अभिनयाच्या क्षेत्रात गुंतून न पडता सामाजिक क्षेत्रातील दिलीप कुमार यांचे कार्य मोठे आहे. मुस्लीम ओबीसी समाजातील सामान्य माणसाला त्यांच्या कार्याने आधार मिळाला. हिंदू ओबीसीप्रमाणेच मुस्लीम ओबीसी जे आरक्षण प्राप्त करून प्रगती साधत आहेत त्यामागे दिलीप कुमार यांचे प्रयत्न होते. भारताचा पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा निशाण ए इम्तियाज हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते. यांच्या वक्तव्याबाबत काही वाद निर्माण झाले. मात्र त्यांची जीवनदृष्टी झळाळून उठली ती कारगिल युद्धाच्यावेळी. समझोता एक्सप्रेस घेऊन पाकिस्तानला गेलेल्या तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शांती प्रस्तावाला पाकिस्तानी लष्करशहाने जोराचा धक्का दिला होता. यावर भारतातर्फे पहिली तीव्र प्रतिक्रिया दिली ती दिलीप कुमार यांनी. त्यांनी ज्ये÷त्वाच्या अधिकाराने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुनावले. पंतप्रधान वाजपेयी यांना त्यांच्या या कृतीने धीर आला आणि भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देऊन ते घुसखोरी युद्ध पाकिस्तानच्या पराभवात परावर्तित केले. शांततेची बाजू मांडणारे नेहमीच टीकेचे धनी असतात. दिलीप कुमार यांची माहिती नसणाऱया पिढीने त्यांना जाणले नाही. जे त्यांना जाणतील ते नेहमीच त्यांच्या प्रेमात पडतील. दिलीप कुमार निवर्तले असले तरी त्यांच्या अभिनयाने ते नेहमीच अमर राहतील.
Previous Article।। अथ श्रीरामकथा ।।
Next Article आत्मा म्हणजे मन नव्हे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.