मुंबई / प्रतिनिधी
अभिनेते ऋषी कपूर यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. आता पुन्हा मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांचा भाचा अरमान जैन याचा लग्न सोहळा पार पडला. पण या एकाही कार्यक्रमात ऋषी कपूर सहभागी झाले नव्हते. पण पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना स्वत: ऋषी कपूर यांनी स्पष्ट केले की, दिल्लीमध्ये मला संसर्ग झाला आणि त्यासाठी माझ्यावर उपचार सुरू होते. प्रदूषणामुळे मला त्रास झाला असावा. पण आता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केल्याचे बोलले जात आहे. त्यांना नेमका काय त्रास होत आहे हे अद्याप समजलेले नाही. पण अरमान जैनची रिसेप्शन पार्टी झाल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारीच ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले होते की, मी दिल्लीमध्ये शुटिंग करत असताना मला त्रास जाणवू लागला. प्रदूषणामुळे माझी तब्येत बिघडली असे त्यांनी सांगितले. मला ताप येत होता आणि न्यूमोनियाची लक्षणे दिसून येत होती. पण वेळीच उपचार झाल्याने मी बरा झालो. मी आता बरा असून सध्या मुंबईत आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले. जवळपास एक वर्ष अमेरिकेत राहून कर्करोगावर यशस्वी उपचार घेतल्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर भारतात परतले होते.