-शिवनदीतील गाळ उपशाचा शुभारंभ
प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठी नदीत जलसंपदा विभागाकडून गाळ उपसा सुरू असतानाच आता शहरातून वाहणारी शिवनदी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळमुक्त होणार आहे. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या गाळ उपशाचा शुभारंभ नाम फाऊंडेशनचे संस्थापक व प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून शिवनदीतील गाळ काढण्याच्या कामास नोव्हेंबरमध्ये सुरुवात करण्यात आली होती. मात्र करण्यात आलेली आर्थिक तरतूद संपल्यानंतर उपसा थांबला होता. त्यानंतर लोकसहभागातून शिवनदीतील गाळ निघण्यासाठी प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी कापसाळ येथे बैठक घेतली होती. मात्र त्यास अपेक्षित अशी चालना मिळाली नाही. त्यामुळे प्रशासनाकडूनच नाम फाऊंडेशनकडे संपर्क साधण्यात आला. त्यासाठी 25 टिपर आणि 5 पोकलॅन्डची मागणी करण्यात आली. त्यांचा हा प्रस्ताव नाम फाऊंडेशनने स्वीकारत पुढील अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत शिवनदी गाळमुक्त करण्याचा निर्णय घेतला. गाळ उपशासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री येथे दाखल झाली आहे. गाळ काढण्याच्या कामावर तांत्रिक सल्लागार म्हणून येथील स्थापत्य अभियंता शहानवाज शहा यांची निवड करण्यात आली आहे. या कामावर नामचे स्वयंसेवक तसेच बचाव समितीचे पदाधिकारीदेखील लक्ष ठेऊन सहकार्य करणार आहेत.
काढलेला गाळ प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेत टाकण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनच्या यंत्रसामुग्रीला प्रशासन इंधन पुरवठा करणार आहे. साडेसात किलोमीटर वाहणाऱया या शिवनदीत साडेतीन ते चार लाख क्युबिक मीटर गाळ साचला आहे. नदीची रुंदी काहीठिकाणी दहा मीटर, तर काहीठिकाणी पंचवीस ते तीस मीटर आहे. त्यामुळे नदीच्या वहन क्षमतेत अडचण येणार नाही. त्यादृष्टीने नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले जाणार आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी 11 वाजता पाग बायपास रस्त्याजवळ शिवनदीतील गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ अभिनेते आणि फाऊंडेशनचे संस्थापक पाटेकर यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीमुळे नागरिकांनी या कार्यक्रमाला गर्दी करू नये, असे आवाहन समन्वयक समीर जानवलकर यांनी केले आहे.