मराठी तरुण तरुणीचे प्रेरणास्थान, मतिमंद मुलांच्या पालकांना दिलासा देणारे व्यासपीठ, कवयित्री, संगीतकार, वक्त्या आणि यशस्वी सनदी अधिकारी असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण (72) यांचे 17 जुलैला कोरोनाच्या आजारामुळे निधन झाले. कवी मनाचे लोक संवेदनशील असतात असे म्हटले जाते. कवी मनाचे देशाच्या सर्वोच्च स्थानावर पोचलेले अटलजी मूलतः कवीच होते तर महाराष्ट्राच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या नीलाताई वयाच्या सातव्या वर्षापासून कविता करत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, त्यांनी या पदासाठी अर्ज केला नसताना बोलावून घेतले होते व राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. ही त्यांच्या कार्यक्षम आणि निष्कलंकपणे केलेल्या कार्याची पावतीच होती. निवडीनंतर या पदाला त्यांनी योग्य न्यायही दिला. फायलीत रमणारे त्यांचे मन साहित्यातही तेवढेच रमत असे. सनदी अधिकारी म्हणून जबाबदाऱया निभावत असताना आलेले अनुभव त्यांनी शब्दांकित करीत तब्बल 13 पुस्तके लिहिली. तीही तिन्ही भाषांमध्ये. प्रवासवर्णन, कादंबरी, कविता अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्या रमल्या. त्यातले सगळय़ात गाजले ते ‘पूर्ण-अपूर्ण’ हे त्यांचे भावपूर्ण आत्मचरित्र. त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या असून काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनही केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला होता व त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा सीबीएसई अभ्यासांतर्गत दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या 1965 साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या होत्या. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. 1972 साली त्या आयएएसची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर विविध जबाबदाऱया पार पाडत त्यांनी सनदी अधिकारपदाच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यात अतिशय कौशल्याने सचिव म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱया लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामडय़ाच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱया स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.
आपल्या कर्तव्यकठोर कार्यपद्धतीमुळे विविध खात्यांवर ठसा उमटवणाऱया कामामुळेच निवृत्तीनंतर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे महत्त्वाचे पद त्यांच्याकडे चालत आले. निवडणुकांचे नियमन करणारे हे पद काही अधिकाऱयांच्या वागण्याने वादग्रस्त झालेले असताना ते लोकाभिमुख करण्याचे काम नीलाताईंनी केले. एवढय़ा मोठय़ा पदावर पोचलेल्या स्त्रीलादेखील काय काय भोगावे लागले होते हे पहायचे असेल तर त्यांनी 2016 मध्ये ‘अक्षरदान-स्पर्धा परीक्षा दिवाळी विशेषांकात आपल्या वाटचालीचा आढावा घेणारा ‘मी अशी’ हा लेख लिहिला होता, तो जिज्ञासू वाचकांनी पूर्ण वाचायला हवा. त्यातील सारांश अनेक निराश होणाऱया स्त्रियांना, निराशेने आत्महत्या करणाऱयांना प्रेरणादायी ठरेल.
समाजाच्या दृष्टीने एक महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय मुलगी भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश करते हे त्यावेळी अप्रूप होते. त्या काळात आयएएससारख्या परीक्षांकडे महाराष्ट्रातील मुले फारशी फिरकतच नव्हती. आयएएस परीक्षेला त्या बसल्या तेव्हा सर्वांनी त्यांना प्रेरणा देण्याऐवजी खच्चीकरण करायला सुरुवात केली. अशा या सगळय़ा प्रतिकूल वातावरणात त्या आयएएस परीक्षेला अनिच्छेनेच बसल्या. त्यांना खरेतर लेखिका व्हायचे होते, नाटक-सिनेमात काम करायचे होते, गायिका व्हायचे होते. पण त्या काळात मध्यमवर्गातील मुलींना अशी फिल्मी स्वप्ने पाहण्याची मोकळीक नव्हती. आई-वडील सांगतील त्या मार्गानेच चालायचे असा शिरस्ता होता.
हायर सेकंडरीला डिस्टिंक्शन मिळवत त्या संस्कृत विषयात पहिला क्रमांक मिळवून दिल्ली बोर्डामध्ये पहिल्या आल्या होत्या. त्यांना डॉक्टर व्हायचे होते पण वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडणार नाही म्हणून वडिलांनी डॉक्टर व्हायला संमती दिली नाही. त्यामुळे त्यांनी थोडय़ाशा नाखुषीनेच एमए करण्यासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला. घरची भावंडे गोरीपान व दिसायला सुंदर असल्याने व त्यांचा रंग काळा सावळा असल्याने कुजकी बोलणी ऐकून घ्यावी लागायची. आईला त्यांचे लग्न कसे होणार म्हणून काळजी वाटायची. तशात मुलगी बघण्याच्या समारंभाला त्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळे घरात एक समरप्रसंगच उभा राहिला होता. अर्थात शेवटी जे विधिलिखित असते ते घडतेच यावर त्यांचा विश्वास होता. श्री. सत्यनारायण यांनी त्यांना रीतसर मागणी घालून, दोन्ही कुटुंबांची संमती घेऊन त्यांचा विवाह झाला. हुंडा न देता, मुलगी बघण्याचा समारंभ न करता, लग्न करायची त्यांची जिद्द पुरी झाली. विश्वप्रसिद्ध ह्य्दयरोगतज्ञ डॉ. नीतू मांडके यांच्या त्या चुलत भगिनी होत्या ही त्यांची आणखी एक ओळख. प्रवास वर्णन, कादंबरी, कविता अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्या रमल्या. त्यातले सगळय़ात गाजले ते ‘पूर्ण-अपूर्ण’ हे त्यांचे भावपूर्ण आत्मचरित्र. पुरुषी वर्चस्व असलेल्या सनदी अधिकारी क्षेत्रात कार्यक्षमपणे ठसा उमटवत असताना आकाशी हिंडणाऱया या ‘घारी’चे लक्ष असे ते आपल्या मतिमंद मुलाकडे. त्याच्या पालकत्वाची जबाबदारी निभावताना येणारे अनुभव त्यांच्या लेखनात डोकावताना या आव्हानावर मात करण्याची जिद्दही दिसते. कोरोना काळात त्या डायरी लिहीत होत्या. त्यात त्यांना काळजी होती ती स्पेशल चाइल्ड असलेल्या चैतन्यची. ही अस्वस्थता त्यांच्या शेवटच्या हतबल आणि भावूक पोस्टमधून उमटली आहे. कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावतील अशी ही पोस्ट आहे. त्या म्हणतात, ‘जवळ जवळ तीन महिने झाले या लॉकडाऊनला. आधी भाजीपाला, वाणसामानही मिळायचं, आता तेही मिळेनासं झालं. कोणाकोणाला विनंती करून सामान मागवलं. दूर जायचं म्हटलं तर गाडी हवी. बस तर बंदच आहे. रस्त्यात पोलिसांची भीती. ते आपला अपमान करतील, गाडी जप्त करतील याची धास्ती. घरात एक मतिमंद मुलगा. तो सैरभैर झालेला. त्याला कळत नाही की आजूबाजूला काय चाललं आहे, का चाललं आहे. त्याला रोज फिरून यायची सवय आहे. ती त्याची गरज आहे. त्याला मी समजावू शकत नाही. मला फार हताश वाटतं. आपण एकमेकांशी बोलतो, मित्रांना फोन करतो, त्याने काय करावं? त्याची घुसमट कोणाला समजणार आहे?’
वाईट याचेच वाटते की, एका कर्तृत्ववान पण अभागी आईला परमेश्वराने असे न्यायला नको होते. घरचे सगळेच संक्रमित झाल्याने त्यांचे अंत्यसंस्कारदेखील महापालिकेच्या अधिकाऱयांना करावे लागले.
विलास पंढरी – 9860613872