विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप – वैयक्तिक रिकर्व्हमध्ये उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ यान्क्टन, अमेरिका
भारताचे तिरंदाज अंकिता भगत, अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा वेन्नम यांनी विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या.
महिलांच्या कंपाऊंड व मिश्र विभागात भारताने अंतिम फेरी गाठत याआधीच दोन पदके निश्चित केली आहेत. वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात अंकिताने सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना कोरियाच्या जागतिक चौथ्या मानांकित कांग चेइ युंगचे आव्हान संपुष्टात आणले. कांग युंगने अलीकडेच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सांघिक सुवर्णपदक मिळविले होते. अंकिताने तिला नमविताना फक्त एक सेट गमविला. तिने 6-4 (29-28, 28-28, 27-27, 24-29, 29-28) असा विजय मिळविला. अंकिताची उपांत्यपूर्व लढत अमेरिकेच्या कॅसे कॉफहोल्हशी होणार आहे.
अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा वेन्नम यांनीही आपापल्या विभागातून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. वर्ल्डकपमधील विद्यमान सुवर्णजेत्या अभिषेकने स्लोव्हाकियाच्या जोजफ बोसन्स्कायचा 145-142 (29-28, 30-27, 28-29, 30-29, 28-29) असा पराभव केला. त्याची पुढील लढत अमेरिकेचा अग्रमानांकित माईक स्क्लोएसरशी होणार आहे. ज्योती सुरेखानेही कोरियाच्या चायवोन सो हिला 146-142 (30-29, 29-29, 28-20, 29-29, 26-29) असा पराभवाचा धक्का दिला. ज्योतीने सलग पाचवेळा पूर्ण 10 गुण मिळविले. त्यात एका एक्सचा (मध्याच्या अगदी जवळ मारलेला तीर) समावेश आहे. अंतिम सेटमध्ये जाताना तिने 117-116 अशी केवळ एका गुणाची आघाडी घेतली होती. दडपणामुळे कोरियन खेळाडूला केवळ 8 गुण नोंदवता आले तर ज्योतीने दोनदा पूर्ण 10 गुण मिळवित विजय निश्चित केला. ज्योतीची पुढील लढत क्रोएशियाच्या अमांदा म्लिनारिकशी होणार आहे. ती विद्यमान यू-21 वर्ल्ड चॅम्पियन आहे.