अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन : प्रमुख अर्थतज्ञांसोबत विचारविनिमय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महामारीने त्रस्त अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि विकासाला गतिमान करण्याच्या उद्देशाने सरकारकडून मांडला जाणारा आगामी अर्थसंकल्प अभूतपूर्व राहणार असल्याचे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य, शेतकरी, उद्योग अन् सेवाक्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आरोग्य, वैद्यकीय संशोधन आणि विकासात गुंतवणूक तसेच टेलिमेडिसीनसाठी व्यापक कौशल्याचा विकास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचबरोबर उपजीविकेसंबंधीच्या आव्हानांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या नव्या दृष्टीकोनातून पहावे लागणार असल्याचे सीतारामन शनिवारी म्हणाल्या.
सीआयआय या उद्योगविषयक संस्थेकडून आयोजित कार्यक्रमाला अर्थमंत्र्यांनी संबोधित केले आहे. यापूर्वी कधीच मांडण्यात आला नव्हता अशाप्रकारचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सूचना पाठवा, महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात 100 वर्षांमधील सर्वात अनोखा अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. याचबरोबर अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पासाठी प्रमुख अर्थतज्ञांसोबत शनिवारी विचारविनिमय केला आहे.
सूचना मागविल्या
सीआयआय भागीदारी संमेलन 2020 ला दृकश्राव्य पद्धतीद्वारे संबोधित करताना सीतारामन यांनी उद्योगक्षेत्राकडून सूचना मागविल्या आहेत. जोपर्यंत उद्योगक्षेत्राशी संबंधित लोकांच्या सूचना आणि अपेक्षा प्राप्त होत नाहीत, तोवर प्रभावी अर्थसंकल्प मांडणे शक्य नाही. उद्योगक्षेत्रासमोरील आव्हानांचे स्पष्ट अवलोकन न करता महामारीनंतर अभूतपूर्व अर्थसंकल्प ठरावा याकरिता दस्तऐवज तयार करणे माझ्यासाठी अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प
2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत 1 फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणार आहे. विकासाच्या गतीला रुळावर आणण्यासाठी कोविड-19 महामारीने ग्रस्त क्षेत्रांना बळ पुरवावे लागणार आहे. हीच क्षेत्रे पुढील काळात विकासाचे वाहक ठरू शकतात, असे उद्गार सीतारामन यांनी काढले आहेत.
जागतिक अर्थकारणात योगदान
भारताचा आकार, लोकसंख्या आणि क्षमता विचारात घेता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उत्तम वृद्धीकरता आम्ही काही अन्य देशांसोबत जागतिक विकासाचा वाहकही ठरू असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जागतिक आर्थिक घडी सावरण्यात भारताचे महत्त्वाचे योगदान राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
खासगी भागिदारी
पायाभूत सुविधांसाठी अधिक निधी पुरविण्यासह भवन तसेच रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी उपलब्ध करणेही महत्त्वपूर्ण आहे. टेलिमेडिसीनला समजून घेण्यासाठी व्यापक कौशल्याची गरज भासणार आहे. उपजीविका हे एक मोठे आव्हान असून याप्रकरणी उद्योगजगतानेही स्वतःचे मत मांडावे, असे अर्थमंत्र्यांनी विधान केले आहे.