गेल्या काही महिन्यांमध्ये काही शाळा-कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “काल किती वेळ अभ्यास केला?’’ या प्रश्नावर अनेकांनी उत्तर दिले, “दोन तास’’. “काय अभ्यास केला?’’ या प्रश्नावर उत्तर मिळाले, “ऑनलाईन लेक्चर अटेंड केले’’. आश्चर्य म्हणजे शेजारी बसलेल्या पालकांनी त्याला दुजोरा देताना मान डोलावली. याचा अर्थ शाळा-कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चर्सना हजेरी लावणे हाच अभ्यास आहे, असा गैरसमज विद्यार्थी आणि पालक यांनी करून घेतलेला आहे. लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर शिक्षण घेण्याचा हा दुष्परिणाम आहे. आपला पाल्य मोबाईलवर काही बघतो आहे, याचा अर्थ तो/ती अभ्यास करत आहे असा गोड गैरसमज पालकांचासुद्धा आहे. ऑनलाईन लेक्चरनंतर मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणे गरजेचे आहे, परंतु ते बऱयाच शिकल्या सावरल्या घरामध्ये होत नाही. हीच मुले अभ्यास करताना मोबाईल शेजारी ठेवतात, काही लिहिता-वाचता अधून-मधून मोबाईलवर सोशल मीडिया आणि बरेच काही बघत असतात तसेच आपल्या पंधरा मिनिटाच्या अनुपस्थितीमुळे जगात काही विपरीत घडलेले आहे का, याबद्दल मोबाईलवर वारंवार तपासून बघत असतात. अभ्यास करताना शेजारी मोबाईल ठेवल्यास कोणताही मेसेज आल्यावर आवाज येतो, सायलेंट मोडवर ठेवल्यानंतरही मोबाईल थरथरतो, ज्यामुळे एकाग्रचित्ताने अभ्यास करणे कठीण जाते. त्यामुळे पंधरा मिनिटाच्या लिखाणाला अर्धा तास वेळ लागतो आणि सलग वाचन होत नाही. “काल वाचन किती वेळ केले?’’ असा प्रश्न विचारल्यानंतर ‘पंधरा मिनिटे’, ‘अर्धा तास’ अशी उत्तरे मिळाली. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की “लेक्चर्स आणि होमवर्क यामुळे वाचनाला वेळच मिळाला नाही’’. तीनशे विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के विद्यार्थी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाचन करत नाहीत असे समजले. “आज आणि काल कोणकोणत्या विषयाचे वाचन केले?’’ या प्रश्नावर कोणत्याही एका विषयाचे नाव विद्यार्थी (विद्यार्थिनी) सांगतात. चार दिवसापूर्वी कोणत्या विषयाचे वाचन केले, हे त्याना आठवत नसते. याचे कारण रोज कोणत्या विषयाचे वाचन करायचे आहे, याचे कोणतेही नियोजन विद्यार्थी करत नाहीत. आपला पाल्य काहीतरी अभ्यास करत आहे, याचे समाधान मानण्यात बरेचसे पालक स्वतःला धन्य समजतात. बऱयाच शाळांचे शिक्षक गृहपाठ देतात तो लिखाणाचा असतो, कारण लिखाण केल्याचा पुरावा तपासता येतो. “उद्या अमुक धडा शिकवणार आहे, तो आज घरी वाचा’’ असा अभ्यास दिला जात नाही. त्यामुळे वाचनाचे महत्व कोणीच सांगत नाही. काहीही न वाचता गृहपाठ करायचा असेल, तर पुस्तक अथवा गाईड समोर ठेवून विद्यार्थी/नी वहीमध्ये उतरवून काढतात. एकूणच विषय न समजता गृहपाठ केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते आणि त्यांना पाठांतर करण्याचा गैरमार्ग स्वीकारावा लागतो. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे वेळेचे आणि वाचन करण्याचे नियोजन.
नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी नवनवे संकल्प सोडले जातात परंतु त्यामधील सातत्य टिकवून ठेवणे किमान पहिला आठवडासुद्धा कठीण जाते. त्यामुळे नवीन वर्षात अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी डायरी खरेदी करून त्यामध्ये किमान पहिल्या महिन्याचे नियोजन लिहून ठेवावे आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली असल्यास त्याचा तपशील रोज नियमितपणे लिहावा. चोवीस तासांपैकी रोज रात्री आठ तासांची झोप आवश्यक असते. व्यक्तिगत देखभाल, रोजचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यामध्ये रोजचे 2 तास वजा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे चौदा तास शिल्लक राहतात. घरकामामध्ये आई-वडिलाना मदत (?) आणि मैदानी खेळ यामध्ये दोन तास आणि शाळााकॉलेजमध्ये आठ तास व्यतीत केले तर अभ्यासाकरीता रोजचे चार तास मिळतात. यापैकी एक तास गृहपाठ/असाइनमेंट वगैरेसाठी एक तास राखून ठेवला तरीही रोज तीन तास वाचनासाठी सहज मिळू शकतात. या वेळेचे रोजचे नियोजन केल्यास सर्व विषयांना समान न्याय मिळू शकतो आणि रोज किमान दोन तास वाचन केल्यामुळे अभ्यासाचा पाया पक्का होतो. कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम असेल तर ती इमारत कितीही मजल्याची असली तरीही अनेक वर्षानंतरही ठामपणे ‘पाय रोवून’ उभी राहते. याच तत्वानुसार अभ्यासाचा पाया म्हणजे पाठ्य़पुस्तक वाचन, जे बरेच विद्यार्थी करत नाहीत. पाठ्य़पुस्तकातील धडा न वाचता/कवितेचा अर्थ न समजता गाईडमधील प्रश्नोत्तरे पाठ करण्याला विद्यार्थी आणि पालक प्राधान्य देतात. त्यामुळे वरच्या इयत्तेमध्ये आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या सवयीचा पश्चाताप होतो. त्यामुळेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी रोज किमान एक तास आणि आठवीपासून रोज किमान दोन तास पाठ्य़पुस्तक वाचन करण्याचे नियोजन आवश्यक ठरते.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या विषयांची सात दिवसात विभागणी करावी आणि बोर्ड/युनिव्हर्सिटीच्या परीक्षेमधील विषयांच्या क्रमानुसार सोमवारी पहिला विषय (प्रथम भाषा), मंगळवारी दुसरा विषय (द्वितीय भाषा), बुधवारी तिसऱया विषयाच्या पाठ्य़पुस्तकाचे वाचन करण्याचे नियोजन करावे. वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणत्याही कारणामुळे खंड पडू न देता अशा पद्धतीने रोज दोन तास नियोजन केलेल्या विषयाचे वाचन करणे, हे अभ्यासाच्या नियोजनाचे पहिले पाउल. नियोजन केल्याप्रमाणे त्या विषयाचे वाचन केल्यानंतर पाठ्य़पुस्तकाची किती पाने वाचून झाली याचे रेकॉर्ड डायरीमध्ये लिहून ठेवावे. आठवीच्या इयत्तेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे एका तासामध्ये किमान दहा ते वीस पाने वाचन व्हावे अशी अपेक्षा आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी एका तासात किमान पन्नास पाने वाचण्याचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा क्रमिक पुस्तकांच्या जोडीला संदर्भ ग्रंथांचे वाचन कसे होणार?
पाठ्य़पुस्तक वाचन झाल्यानंतर संदर्भ पुस्तकांचे वाचन आणि त्यानंतर परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी याचे तंत्र समजून घेण्याचे वाचन असा वाचन क्रम असावा. प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचे एक तंत्र असते जे भाषेसाठी वेगळे, शास्त्रासाठी वेगळे आणि इतिहास-भूगोलासाठी वेगळे असते. ते समजून घेऊन पाठ्य़पुस्तकांचे किमान दोन वेळा वाचन पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांची उत्तरे पाठ करण्याची गरज भासत नाही. इतिहास-भूगोलाच्या पाठ्य़पुस्तकाला संबंधित शॉर्ट फिल्म बघण्याची जोड देणे गरजेचे असते, जे शनिवार-रविवारी करता येते. निबंध लेखन-पत्र लेखन यासाठी नियमितपणे वृत्तपत्र वाचन करणे गरजेचे असते. त्यामुळे शनिवार-रविवारची वृत्तपत्रे वाचल्यास निबंध कसा लिहावा, याची घोकंपट्टी करावी लागत नाही.
कोणताही विषय एकदा वाचून समजत नसेल तर आपण ज्या पद्धतीने वाचतो त्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्यामुळे वाचन कसे करावे, वाचनाचा वेग कसा वाढवावा, काय वाचावे याबद्दल पुढील लेखामध्ये.
– सुहास किर्लोस्कर