संजीव खाडे / कोल्हापूर
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केला आहे. राजकीय पक्षही सर्व इच्छुकांवर लक्ष ठेवून आहेत. मात्र अजूनही कुणालाही शब्द देण्यात आलेला नाही. अशा वातावरणात हक्काच्या प्रभागावर आरक्षण पडल्याने अडचणीत आलेल्या अभ्यासू नगरसेवकांचे पुनर्वसन कसे करायचे? असा प्रश्न पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. त्यातून लगतचे, पोषक वातावरणात असलेले प्रभाग शोधण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
महापालिकेच्या 2015 ते 2020 या सभागृहात काही नगरसेवकांनी अभ्यासू नगरसेवक म्हणून आपली छाप पाडली. त्यामध्ये काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, माधुरी लाड, भाजपकडून विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, गटनेते अजित ठाणेकर, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका रूपाराणी निकम, पूजा नाईकनवरे आदींचा समावेश आहे. जनतेचे प्रश्न आक्रमक आणि अभ्यासूपणे मांडणाऱया नगरसेवकांत या सर्वांचा समावेश होता. पण या सर्वांच्या हक्काच्या प्रभागावर आरक्षण पडल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी सुरक्षित प्रभागाचा शोध सुरू केला आहे. पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या पुनरवर्सनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
शारंगधर देशमुख यांच्या रंकाळा तलाव प्रभाग क्रमांक 71 वर ओबीसी आरक्षण पडल्याने ते आता सानेगुरूजी प्रभाग क्रमांक 74 मधून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. पक्षानेही त्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. भूपाल शेटे यांचा सुभाषनगर प्रभाग 61 हा सर्वसाधारण गटासाठी खुला झाला आहे. त्यामुळे शेटे यांना या प्रभागातून लढता येते. पण ते या प्रभागातून लढणार की लगतचा प्रभाग शोधणार हे लवकरच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीच्या माजी महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर यांचा शाहू कॉलेज कॉलेज प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्या बचावल्या आहेत. त्यांची उमेदवारी पुन्हा असेल. पण त्यांचे पती शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी 2010 ते 2015 च्या सभागृहात अभ्यासू नगरसेवक म्हणून लौकिक संपादन केला होता, मात्र त्याच लाटकर यांना 2015 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 ताराबाई पार्कमध्ये भाजपच्या माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्याकडून आणि नंतर निलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर ताराबाई पार्क प्रभाग 11 मधून रत्नेश शिरोळकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी सभागृहात येण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते.
यंदाही ताराबाई पार्क प्रभाग अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने लाटकर यांची अडचण झाली आहे. ते सुरक्षित प्रभागाच्या शोधात आहेत. काँग्रेसच्या माधुरी लाड यांचा कसबा बावडा लाईन बाजार प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण प्रभागासाठी खुला झाला आहे. त्यामुळे लाड यांच्यासह इतर इच्छुकही या प्रभागात दावेदार आहेत. भाजपचे अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक म्हणून विजय सूर्यवंशी यांचा शहरात लौकिक आहे. इंजिनिअर आणि बांधकाम व्यावसायिक असणाऱया सूर्यवंशी यांचा मंगेशकर नगर प्रभाग क्रमांक 44 हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांनी लगतच्या सुरक्षित प्रभागाचा शोध सुरू केला आहे. पक्षानेही त्यांना हिरवा झेंडा दाखविला आहे.
भाजपच्या अजित ठाणेकर यांचा तटाकडील तालीम प्रभाग क्रमांक 48 हा देखील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना नवीन सभागृहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिर या प्रभागात ठाणेकर यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम यांचा भोसलेवाडी – कदमवाडी प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ते कदमवाडी प्रभाग क्रमांक 9 मधून उतरणार हे जवळपास निश्चित आहे. ताराराणी आघाडीच्याच अम्यासू आणि आक्रमक नगरसेविका रूपाराणी निकम यांनी गेल्या सभागृहात छाप पाडली होती. त्यांचा स्वातंत्र्य सैनिक वसाहत प्रभाग क्रमांक 66 सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे त्या किंवा त्यांचे पती संग्रामसिंह उमेदवार असणार आहेत.
]ताराराणीच्या पूजा नाईकनवरे यांनी देखील आपल्या वक्तृत्वाची आणि प्रश्न मांडण्याच्या शैलीची छाप गेल्या सभागृहात पाडली होती. त्याचा शाहूपुरी तालीम प्रभाग क्रमांक 25 ओबीसी झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. गेल्या सभागृहात पोट निवडणुकीत ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेल्या रत्नेश शिरोळकर यांना केवळ दीड दोन वर्षे मिळाली. त्यात अल्पावधीत त्यांनी आपल्या अभ्यासू शैलीतून प्रशासनावर छाप पाडली. ताराबाई पार्क प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे इतर प्रभाग शोधावा लागणार आहे.
राजकीय पक्षांचे नेतेही आग्रही
नवीन सभागृहात आपल्या पक्षाचा अभ्यासू नगरसेवक, गटनेता असावा यासाठी राजकीय पक्षांचे नेते आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनीही सुरक्षित प्रभागा शोधण्यास सुरूवात केली आहे.