श्रीनगर / वृत्तसंस्था
यंदाची अमरनाथ यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत 43 दिवसांच्या यात्रेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यात्रामार्गातील प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
अमरनाथ यात्रेसाठी येणाऱया यात्रेकरूंची ऑनलाईन नोंदणी एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने अलीकडेच यासंबंधीची घोषणा केली होती. एका दिवसात केवळ 20 हजार नोंदणी होणार असल्याचे श्राईन बोर्डाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ऑनलाईन नोंदणीबरोबरच प्रवासाच्या दिवशी काउंटरवर जाऊनही नोंदणी करता येईल, अशी माहिती श्राईन बोर्डाने दिली आहे.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची रविवारी अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकाऱयांसोबत बैठक झाली. या बैठकीत 43 दिवस चालणारी अमरनाथची पवित्र यात्रा कोरोनाचे सर्व नियम पाळून 30 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार असल्याचे ट्विट राज्यपाल कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर पूर्ववत
दरम्यान, देशातील कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथची यात्रा रद्द करण्यात आली होती. कोरोनाच्या उदेकामुळे गेल्या दोन वर्षांत केवळ प्रतिकात्मक स्वरुपात यात्रा पाळण्यात आली होती. सलग दोन वषी यात्रा सर्वसामान्य भाविकांसाठी रद्द करण्यात आल्यानंतर यंदाही या यात्रेवर कोरोनाचे थोडय़ाफार प्रमाणात सावट आहे. सध्या केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवल्यामुळे यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. तथापि, यात्राकाळात पुन्हा कोरोनासंसर्ग वाढल्यास निर्बंध कडक केले जाऊ शकतात, असे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्या कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे श्राईन बोर्डाने बैठकीनंतर सांगितले.