श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शुक्रवारी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. पहलगाममधील श्रीचंद टॉप येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली. या कारवाईला यश आल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमधील श्री अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्याची तयारी सुरू असतानाच ही चकमक झाल्याने अधिक सतर्कता बाळगली जात आहे.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे अमरनाथ यात्रा पुढे ढकलल्यानंतर यंदा ती पुन्हा सुरू होत आहे. ही यात्रा पुढील महिन्यात 30 जूनपासून सुरू होऊन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेला यापूर्वीही अनेकदा दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. यावषी यात्रा सुरक्षित करण्यासाठी बीएसएफ आणि इतर सुरक्षा दल या भागावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गुरुवारीच येथे सुरक्षा यंत्रणांनी एका भुयारी मार्गाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आणि एका दहशतवाद्याला पकडत घातपाताचा कट उधळून लावला आहे.
सुरक्षा दलांनी अनंतनाग जिह्यातील कोकरनाग परिसरातून एका हिजबुल दहशतवाद्याला अटक केली होती. मोहम्मद इश्फाक शेरगोजरी असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो नौगामचा रहिवासी आहे. इश्फाक हा सप्टेंबर 2017 पासून सक्रिय आणि सी-श्रेणीचा दहशतवादी होता, तो अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होता. इश्फाकच्या अटकेनंतर पहलगाममधील कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एक दहशतवादी संघटनेचा कमांडर असून तो 2016 पासून सक्रिय असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
भुयारी मार्गाद्वारे घुसखोरीचा कट
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिह्यातील चक फकिरा येथे बीएसएफ अधिकाऱयांना गुरुवारी एक भुयारी मार्ग सापडला होता. हा भुयारी मार्ग आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होता. तसेच तो पाकिस्तान पोस्ट चमन खुर्दपासून केवळ 900 मीटर अंतरावर आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी अलर्ट मोडवर आले आहेत. हा बोगदा अलीकडेच खोदण्यात आला असून तो बुजविल्यामुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळला गेला आहे.