पंजाबच्या राजकारणाला निर्णायक वळण लागण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये काँगेस पक्षात अंतर्गत संघर्ष पेटलेला असतानाच पदच्युत करण्यात आलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी येथे बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यांच्यामध्ये 45 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा उपस्थित होते असी सूत्रांची माहिती आहे. अमरिंदरसिंग भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अमरिंदरसिंग यांना राज्यसभेवर निवडून आणून त्यांच्याकडे केंद्रीय कृषीमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात येऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास तो काँगेससाठी प्रचंड धक्का ठरणार आहे. काँगेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नुकतीच पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीतसिंग चन्नी यांची निवड केली आहे. मात्र, प्रदेश काँगेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी चन्नी यांच्या मंत्रिमंडळातील काही नावांवर नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समर्थनाथ रझिया सुलताना या मंत्र्यांनी राजीनामा दिला असून काँगेसच्या तीन पदाधिकाऱयांनीही सिद्धूंच्या समर्थनार्थ पदत्याग केल्याने खळबळ माजली आहे.
शेतकरी आंदोलनाशी संबंध
केंद्र सरकारने गेल्या वर्षी नवे कृषी कायदे केले होते. मात्र पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात या कायद्यांना विरोध होत आहे. अनेक कृषी संघटनांनी गेले 10 महिने या कायद्यांविरोधात आंदोलन चालविले आहे. आता अमरिंदरसिंग भाजपमध्ये आल्यास ते सरकार आणि आंदोलन शेतकरी यांच्यातील दुवा बनू शकतात, अशी अटकळ आहे. शेतकऱयांची चर्चा करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविली जाण्याची शक्यता आहे. त्यांना कृषीमंत्रीपद या चर्चेच्या आदी दिले जाते की आंदोलनाचा प्रश्न मिटल्यानंतर, हा देखील चर्चेचा मुद्दा आहे. अमरिंदरसिंग प्रारंभापासून आंदोलनाचे समर्थक राहिले आहेत. त्यांचे आंदोलकांच्या नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ते प्रभावी मध्यस्थी करु शकतील, असा विश्वास केंद्र सरकारला वाटतो, असेही मानले जात आहे.
भाजपसमोर मांडले पर्याय
मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर अमरिंदरसिंग काय करणार यावर बरीच उलटसुलट मते व्यक्त होत होती. आपल्यासमोरील सर्व पर्याय खुले आहेत, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. त्याचवेळी ते भाजपमध्ये जाणार ही शक्यता समोर आली होती. आता ही शक्यता अधिक दाट झाली आहे. त्यांनी भाजपसमोर काही पर्याय मांडले असून त्यावर चर्चा झाल्यानंतर ते भाजपवासी होतील असे बोलले जाते. पण अद्याप दोन्ही बाजूंकडून अधिकृतरित्या कोणत्याच शक्यतेवर भाष्य झालेले नाही. तथापि, एक आठवडय़ात चित्र स्पष्ट होईल, हे दिल्लीतील राजकीय वर्तुळात निश्चित मानले जात आहे.
काँगेससाठी इकडे आड तिकडे विहीर
सिद्धूंना सांभाळावे तर अमरिंदरसिंग हातातून निसटतात आणि अमरिंदरसिंगांना धरुन ठेवावे तर सिद्धू नाराज होतात, अशा कोंडीत काँगेस सापडलेली आहे. नवे मुख्यमंत्री चन्नी यांना पदग्रहण करुन 100 तासही उलटलेले नसताना, त्यांच्यासमोर पक्षात पडू शकणारी उभी फूट टाळण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यांनी बुधवारी सिद्धू यांच्याशी संपर्क केला. पक्ष सर्वतोपरी असून प्रत्येक नेता पक्षाशी एकनिष्ठ राहील. सिद्धू पक्षत्याग करणार नाहीत, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मात्र, आपण तत्वांशी कोणतीही तडजोड करणार नाही. त्यांसाठी शेवटपर्यंत लढा देण्याची तयारी आहे, असे वक्तव्य सिद्धू यांनी केल्याने त्यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही, हे स्पष्ट होत आहे.
श्रेष्ठींनी हात झटकले
मुख्यमंत्री बदलण्यात काँगेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने, मुख्यतः राहुल गांधींनी पुढाकार घेतला होता. तथापि, त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच चिघळल्याचे लक्षात येताच त्यांनी राज्यातील नेत्यांनाच मदभेद मिटवा आणि समस्येवर तोडगा काढा असा सल्ला दिला. मुख्यमंत्री बदलण्याचा उपाय अंगलट आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अशा प्रकारे हात झटकल्याने अधिकच गोंधळ माजला आहे.
बहुमतसिद्धतेचे आव्हान
नव्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अद्याप बहुमत सिद्ध केलेले नाही. सिद्धू आणि अमरिंदरसिंग या दोन्ही नेत्यांच्या समर्थक आमदारांनी बहुमतसिद्धता करा असा आग्रह धरला आहे. बहुमतसिद्धतेची मागणी वास्तविक विरोधी पक्षांकडून केली जाते. मात्र पंजाबमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच अशी मागणी करु लागल्याने नव्या सरकारसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकल्याचीही चर्चा आहे.
निर्णायक वळणाच्या दिशेने...
ड अमरिंदरसिंग भाजप नेत्यांना भेटल्याने काँगेसमध्ये भूकंप
ड मुख्यमंत्री बदलाचा राहुल गांधींचा डाव उलटण्याची चिन्हे
ड सिद्धूंच्या समर्थनार्थ आणखी राजीनामे येण्याची शक्यता
ड सिद्धू की अमरिंदरसिंग अशा द्विधा मनःस्थितीत पक्षश्रेष्ठी
ड पक्षश्रेष्ठींनी हात झटकले, राज्यातील नेत्यांनाच आवाहन