वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर पहिल्यांदाच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर टीका केली आहे. खोटी आश्वासने देत शेतकऱयांची दिशाभूल करू नका असे कॅप्टननी चन्नी यांना सुनावले आहे. किसान संघाचे नेते बलवीर सिंह राजेवाल यांच्याशी तिन्ही कृषी कायद्यांसंबंधी चर्चा केल्याचे चन्नी यांनी म्हटले होते.
कृषी कायद्यांवरून पंजाबचे मुख्यमंत्री शेतकऱयांना खोटी आश्वासने देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही यापूर्वी शेतकरी नेत्यांशी कृषी कायद्यांवर दीर्घ चर्चा केली आणि विधानसभेत दुरुस्ती कायदेही संमत केले आहेत. पण राज्यपालांकडून याला मंजुरी मिळालेली नसल्याचे अमरिंदर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर यांनी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या पक्षासोबत मैदानात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे. कॅप्टन यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच कॅप्टन यांनी भाजप तसेच अन्य काही पक्षांसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.