पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये वादंग संपण्याच्या मार्गावर, सिद्धूंनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे, शेतकऱयांना प्राधान्य
वृत्तसंस्था /चंदीगढ
पंजाबमध्ये काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रव ारी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याबरोबर जुळवून घेण्याचे संकेत दिले आहे. सिद्धू यांच्या समवेत चार कार्यकारी अध्यक्षांनीही पदभार स्वीकारला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंना विरोध केला होता.
पदभार स्वीकारल्यानंतर सिद्धू यांनी सौम्य भूमिका घेत अमरिंदर सिंग यांच्यासह काम करणार असल्याचे संकेत दिले. अमरिंद सिंग हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना माझा कुठल्याही प्रकारे विरोध नाही. तसेच आपला कोणताही व्यक्तीगत स्वार्थ नाही. राज्याच्या हितासाठी आपण पक्षाध्यक्ष पदावरून काम करत राहू, असे प्रतिपादन सिद्धू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केले.
सिद्धू प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांना व इतर आमदारांना चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे त्यांनीही आपली ताठर भूमिका सोडल्याचे दिसून येत आहे. गेले काही दिवस या दोन नेत्यांमधील परस्पर बेबनावामुळे पंजाब काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात शक्ती प्रदर्शनही केले. या शक्ती प्रदर्शनात सिद्धू यांची बाजू वरचढ असल्याचेही दिसून आले. सिद्धू यांनी आयोजित केलेल्या सुवर्ण मंदिरातील कार्यक्रमात काँग्रेसचे 77 पैकी 62 आमदार उपस्थित होते. यामुळे अमरिंदर सिंग यांनी सध्या काहीशी सौम्य भूमिका घेतलेली असावी अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अमरिंदरसिंगांचे भाषण
अमरिंदर सिंग यांनीही त्यांच्या भाषणात एकत्र कार्य करण्याचे आश्वासन दिले. पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांना मान्य आहे. पंजाबच्या सरकारवर आणि काँग्रेसच्या पंजाब शाखेवर केवळ पंजाब राज्याचीच नाही तर भारताच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी आहे. पंजाबची सीमा रेषा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे हे उत्तरदायीत्व अधिकच वाढते, असे प्रतिपादन अमरिंदर सिंग यांनी केले. पंजाबमध्ये येत्या मार्चमध्ये विधानसभा निवडणूक आहे.