मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेत महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार स्थापन करून शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मात्र, शिवसेनेवर नाराज झालेल्या भाजपाकडून सुरुवातीपासूनच राज्यात सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. तसेच, आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असं देखील भाजपाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. राज्यातील भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर टीका करणं सुरूच आहे. यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थिती असेल अथवा सरकार मधील अंतर्गत मतभेद. पण महाविकास आघाडी सरकारने हे सरकार पाच नाही तर पंचवीस वर्षे टिकणार असल्याचे म्हंटले आहे. आता भाजपाचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, अशी ‘भविष्यवाणी’ केली आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लक्ष्यकरत निशाणा साधला.
यावेळी बोलताना मंत्री दानवे यांनी हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाही. त्यामुळे हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही”, असं दानवे म्हणाले.
दरम्यान, दानवे यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना त्यांनी सरकारला अमर, अकबर, अँथनी या विशेषणावरून सिनेमाचीच उपमा दिली आहे. त्यांनी “सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर पेक्षकांना सिनेमा पाहण्यासाठी पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडतात. आम्ही सरकारच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू”, असं दानवे यावेळी म्हणाले.