मावळते महापौर उदय मडकईकर यांनी व्यक्त केले समाधान : कारकिर्दीतील कामांचा घेतला आढावा सर्वांचे मानले आभार
प्रतिनिधी / पणजी
महापौर म्हणून दोन वर्षांच्या कारकिर्दीत अनेक समाजोपयोगी उपक्रम, प्रकल्प राबविले, विकासकामे मार्गी लावली त्याबद्दल समाधान आहेच, मात्र कांपाल परिसरात मोठय़ा प्रमाणात चालणारा अमलीपदार्थ व्यवहाराचा अड्डा उध्वस्थ करण्यात यशस्वी ठरलो याचा सर्वाधिक अभिमान वाटतो, अशी माहिती मावळते महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
शुक्रवारी त्यांचा कार्यालयातील शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी कारकिर्दीतील कार्याचा आढावा घेतला. राजधानीतील कचऱयाची समस्या जवळजवळ संपुष्टात आणली. बायंगिणी येथे अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून त्यानंतर पणजीसह संपूर्ण तिसवाडीतील कचरा समस्या कायमस्वरुपी निकाली निघेल, असे ते म्हणाले.
त्याचबरोबर गटारांची साफसफाई प्राधान्याने हाती घेतली. त्यामुळे पावसाळ्यात शहरासह खास करून मळा भागात निर्माण होणाऱया पूरसदृष्य स्थितीवर तोडगा काढण्यात आपण यशस्वी ठरलो, असे सांगून सर्व संबंधित फ्रंटलाईन कर्मचारी व सफाई कामगारांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
अत्याधुनिक स्मशानभूमीचे लोकार्पण
केवळ गोव्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशात अत्याधुनिक ठरेल अशा स्मशानभूमी व कब्रस्तान प्रकल्पाचे आपल्या कारकिर्दीत लोकार्पण करण्यात आले, याचेही समाधान वाटते असे ते म्हणाले.
पार्किंग व्यवस्थेत आणली सुसुत्रता
पणजी मार्केटमधील अस्ताव्यस्तपणा, व्यापाऱयांचा मनमानीपणा मोडून काढत तेथे बऱयाच प्रमाणात सुव्यवस्था आणली. ’पे पार्किंग’ च्या निर्णयामुळे विनाकारण उभी ठेवण्यात येणाऱया वाहनांची संख्या कमी झाली. त्यातून अन्य वाहनांसाठी जागा उपलब्ध झाली. तसेच वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेली बेवारस वाहनेही उचलली. त्यामुळे पार्किंग व्यवस्थेत प्रचंड सुसुत्रता आली. शहरातील भेळपुरी, ऑम्लेटच्या गाळ्यांमुळे सर्वत्र गलिच्छता पसरत होती. ते सर्व गाळे कायमस्वरुपी बंद करण्यात आले.
शहरात भिकाऱयांची वाढती संख्या ही एक मोठी समस्या असून त्यामागे मोठे रॅकेट वावरत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे लोकांनी भिकाऱयांना पैसे देऊ नये, त्यापेक्षा एखादा खाद्यपदार्थ किंवा कपडे द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाकाळात गरीब गरजूंना कडधान्य व अन्य खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच विनामास्क फिरणाऱयांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाईही केली, असे त्यांनी सांगितले.
शहरात सध्या चालू असलेली वीज, पाणी, गॅस यांचे केबल किंवा पाईप टाकण्याची कामे संपुष्टात येताच एप्रिलपर्यंत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारात आपणास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव, पालिका खात्यातील अधिकारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, आयुक्त, नगरसेवक आणि एकुणच पणजीतील नागरिक यांचेही पूर्ण सहकार्य लाभले, असे नमूद करत उदय मडकईकर यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.