अमल महाडिकांची माघार : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिल्लीवरून फोन
ऑनलाईन टीम /तरुण भारत
सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण, राज्यातील सहाही विधान परिषदेच्या या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. यासाठी काँग्रेस आणि भाजप अनुकूल असून तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी दिला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिलीय. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधानपरिषदेची जागा बिनविरोध झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश दिल्ली येथून आल्यानंतर आज तात्काळ भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला होता. यावेळी कोल्हापूर आणि नागपूरची जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले आह. काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांची घोषणा झाली, तसेच काँग्रसने देखील उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापुरातून भाजपकडून अमल महाडीक यांना संधी दिली. अमल महाडिकांना टक्कर देण्यासाठी सतेज पाटील आहेत. पण, कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे त्यामुळे अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून सतेज पाटील हे बिनविरोध झाले आहेत.