ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे कठीण असल्याचे वक्तव्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणे सोपे नाही असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध.भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे म्हटले आहे.
अमिताभ कांत हे मंगळवारी ‘स्वराज्य पत्रिका’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वार्तालापात बोलत होते. भारतात कोणत्याही सुधारणा लागू करणे खूपच अवघड आहे. भारतात जरा जास्तच लोकशाही असल्यामुळे असे घडते. केंद्र सरकारने पहिल्यांदाच खाणकाम, कोळसा, मनुष्यबळ आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांना हात घातला आहे. आता त्याच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी करणे राज्यांचे काम आहे, असे अमिताभ कांत यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
- शेतकरी आंदोलनाबाबत अमिताभ कांत म्हणाले…
अमिताभ कांत यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भातही भाष्य केले. भारतीय कृषी क्षेत्रात सुधारणांची गरज आहे. किमान हमीभाव ही एकप्रकारची व्यवस्था बनून जाईल, बाजार समित्यांमध्ये आताप्रमाणेच काम सुरु राहील, मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पीक विकण्याची मुभा मिळणे गरजेचे आहे. याचा त्यांना लाभ होईल, असे मत अमिताभ कांत यांनी सांगितले.