नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता निर्माण झाल्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्वरित दिल्लीत पोहचले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. प्राप्त परिस्थितीत भाजपची भूमिका काय असू शकते, यावर तीन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मंगळवारी महाराष्ट्रात होते. तेही त्वरित दिल्लीत पोहचले. त्यांनीही नंतर फडणवीस आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन धोरण ठरविण्याविषयी चर्चा केली असे वृत्त सूत्रांनी दिले आहे. महाराष्ट्रातील घडामोडींसंबंधी अद्याप भाजपच्या राज्यातील किंवा राष्ट्रीय नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त पेलेली नाही. तथापि, भाजप थांब आणि वाट पहा या भूमिकेत असल्याचे दिसून येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही सूचना महाराष्ट्रातील नेत्यांना केल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळोवेळी देण्यात येत आहे. तथापि, पंतप्रधान मोदींनीही अद्याप कोणताही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. परिस्थिती विशिष्ट दिशेने पूर्णतः विकसीत झाल्याखेरीज भाजप तोंड उघणार नाही, असे दिसून येत आहे.
भाजपलाही आश्चर्य ?
10 जूनला झालेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपला अनपेक्षितरित्या सहापैकी तीन जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीत फूट पडल्याने भाजपला 10 मतांचा लाभ होऊन त्याचा तिसरा उमेदवारही निवडून आला होता. त्यापाठोपाठ गेल्या सोमवारी विधानपरिषदेच्या विधानसभेतून निवडून देण्याच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात महाविकास आघाडीचे आणखी 11 आमदार फुटल्याने भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आला होता. तेव्हापासूनच महाविकास आघाडीत सर्व काही ठीकठाक नाही याचे अनुमान काढता येत होते. तथापि, शिवसेनेमध्ये इतक्या लवकर बंड होईल आणि इतके आमदार एकाचवेळी राज्य सोडतील ही परिस्थिती भाजपसाठीही आश्चर्यकारक होती अशी चर्चा आहे.