157 पुरातन कलाकृतींसह भारतात आगमन, भव्य स्वागत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी रविवारी भारतात परतले असून त्यांनी येताना अमेरिकेतून 157 भारतीय कलाकृतीही परत आणल्या आहेत. या कलाकृती भारतातून तस्करीच्या माध्यमातून अमेरिकेत गेल्या होत्या. अमेरिकन पोलीसांनी त्या जप्त केल्या आणि आता त्या पुन्हा भारताच्या आधीन झाल्या आहेत. त्या भारताचा वारसा मानल्या जातात.
या वस्तूंमध्ये 12 व्या शतकातील नटराजाची काश्याची मूर्ती, 10 व्या शतकातील दगडी नंदी यांचा समावेश आहे. याशिवाय इतर अनेक छोटय़ा मोठय़ा वस्तू आता भारतात परतल्या आहेत. अमेरिकेच्या प्रशासनाने त्या तस्करांकडून ताब्यात घेतल्या होत्या. एकप्रकारे भारताला त्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवाच परत मिळाला. यातील 45 कलाकृती इसवी सन पूर्वीच्या आहेत.
अमेरिकेचा दौरा भारतासाठी यशस्वी ठरला. पाकिस्तानला एकाकी पाडण्यात आणि अफगाणिस्तानमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकादा जागतिक मंचावर आणण्याची कामगिरी भारताने बजावली. त्यामुळे पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हा दौरा ऐतिहासिक ठरला असून अमेरिकेशी भारताचे संबंध अधिक दृढ झाले. तसेच क्वाडच्या माध्यमातून इतर देशांमध्येही भारताची वट निर्माण झाली. भारताचे आंतरराष्ट्रीय महत्व आणखी वाढले, अशी भलावण होत आहे.
महत्व अधोरेखीत
सध्याच्या परिस्थितीत चीनचा वाढता विस्तारवाद आणि दहशतवादाचा उदय या पार्श्वभूमीवर भारताचे महत्व जगाला पुन्हा एकदा पटल्याचे या दौऱयात दिसून आले. तालिबानला मान्यता मिळवून देण्याचा पाकचा डाव त्याच्यावरच उलटला. तसेच चीनचीही फारशी मात्रा चालली नाही. भविष्यकाळातही भारताकडे पाहण्याचा पाश्चात्त्यांचा दृष्टीकोन असाच असेल, असे तज्ञांचे मत आहे.