भारताचा सांस्कृतिक वारसा असणाऱया पण आपल्याच दुर्लक्षामुळं तस्करीच्या माध्यमातून अमेरिकेत पोहचलेल्या 94 मूर्ती भारताला परत करण्यास अमेरिकेनं प्रारंभ केला आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडानंही अशाच काही ऐतिहासिक महत्वाच्या मूर्ती परत केल्या होत्या. त्यांच्यात वाराणसी येथून 100 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मूर्तीही होती. आता या मूर्तीची विधिवत पुनर्स्थापना त्याच स्थानी झाली आहे.
अमेरिकतून परतणाऱया मूर्तींमध्ये 2100 वर्षं जुन्या असणाऱया मूर्तींचाही समावेश आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व मूर्ती भारतात आलेल्या असतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी आणि तज्ञांनी अमेरिकेला जाऊन या मूर्ती पाहिल्या आहेत. त्या भारतातीलच आहेत याची हमी त्यांनी दिली आहे. त्यानंतर त्या भारताला परत करण्याचा निर्णय अमेरिकेच्या प्रशासनानं घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौर केला होता. तेव्हा अमेरिकेनं 157 मूर्ती परत दिल्या होत्या. आता आणखी 94 मूर्ती भारतात परतत आहेत. या मूर्तींमध्ये 27 मूर्ती या काश्याच्या (ब्राँझ) आहेत, तर काही मूर्ती दगडी आणि टेराकोटाच्या आहेत. तामिळनाडूच्या मंदिरांमधून चोरीला गेलेल्या 3 मूर्तीही यात आहेत. यांपैकी मंजुश्री देवीची मूर्ती काश्याची असून ती 10 व्या शतकातील आहे. मध्यप्रदेशातील कारीतलाई येथून चोरीला गेलेली मूर्तीही परत मिळणार आहे. तर मध्यप्रदेशातीलच भरहूत येथून गेलेली 16 व्या शतकातील महाकोका देवतेची मूर्ती महत्वाची आहे. चोळ राजघराण्याच्या काळातील काही मूर्तींचाही समावेश यांमध्ये आहे. आता यामूर्ती भारतात पुन्हा येतील. त्यांची विधिवत पुनर्स्थापनाही मूळच्या स्थानी केली जाईल. तथापि, यापुढं तरी त्यांची चोरी होऊ नये याची दक्षता प्रशासनांनं घेणं आवश्यक आहे. कारण या मूर्ती आपल्या संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचं संरक्षण करणं आपलंच उत्तरदायित्व आहे. प्रथम त्या जाऊ द्यायच्या आणि नंतर इतर देशांनी त्या परत द्यायच्या हे चालू देऊ नये.