ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला फटकारले आहे. ओआयसीला भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. तसेच पाकिस्तानसारख्या एका अयशस्वी आणि दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून भारताला धडे घेण्याची गरज नाही, असे भारताने पाकला सुनावले.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने काश्मीर मुद्यावरुन पाकवर जोरदार निशाणा साधला. भारताच्या भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. हिंदू, शीख आणि ख्रिश्चन आणि अहमदियासारख्या समुदायाबद्दलची पाकिस्तानची वृत्ती जगापासून लपलेली नाही. तसेच संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना समर्थन देणे, त्यांना आर्थिक रसद पुरविणारा आणि शस्त्रपुरवठा करणारा देश म्हणून पाकची जागतिक पातळीवर ओळख आहे. असा पाकिस्तान भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा आधार घेतो. पाकिस्तान आपल्या अजेंडय़ासाठी ओआयसीचा वापर करत आहे. त्यामुळे ओआसीने पाकच्या या मुद्याचे समर्थन करायचे की नाही, हे ठरवावे, असेही भारताने म्हटले आहे.